'मल्लिकार्जुन खरगेंचे घर जाळले...मतांसाठी कुटुंबीयांचे बलिदान विसरले', CM योगींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 18:05 IST2024-11-12T18:04:15+5:302024-11-12T18:05:00+5:30
Yogi Adityanath on Mallikarjun Kharge : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापले आहे.

'मल्लिकार्जुन खरगेंचे घर जाळले...मतांसाठी कुटुंबीयांचे बलिदान विसरले', CM योगींचा हल्लाबोल
Yogi Adityanath on Mallikarjun Kharge : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आपली पूर्ण ताकद लावत आहेत. एकीकडे काँग्रेस भाजपवर संविधनाच्या मुद्द्यावरुन टीका करत आहेत, तर दुसरीकडे भाजप 'बटेंगे तो कटेंगे' म्हणत काँग्रेसवर विभाजनाचे राजकारण करत असल्याची टीका करत आहे. यादरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या टीकेला आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
योगींचा खर्गेंवर जोरदार प्रहार
योगी आदित्यनाथ आपल्या प्रत्येक प्रचारसभेत 'बटेंगे तो कटेंगे' ही घोषणा करत आहेत. ही घोषणा संविधानविरोधी असल्याची टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. त्यावर आता योगी आदित्यनाथ महाराष्ट्रातील अचलपूर येथील सभेत बोलताना म्हणाले की, 'निजामाच्या रझाकारांनी मल्लिकार्जुन खरगे यांचे गाव जाळले होते. त्यात त्यांची आई, मावशी आणि बहीण मरण पावले. पण, खरगे खरं बोलायला घाबरतात, कारण निजामावर आरोप केले तर मुस्लिम मते मिळणार नाहीत. रझाकारांनी हिंदूंच्या कत्तली केल्या, पण, खरगेंना सत्य स्वीकारायचे नाही. मतांसाठी खरगे कुटुंबाचा त्याग विसरले.'
काय म्हणाले होते मल्लिकार्जुन खरगे?
झारखंडमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेवर निशाणा साधला होता. त्यांनी या घोषणेला दहशतवाद्यांची भाषा म्हटले. यावेळी त्यांनी योगी आदित्यनाथ यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. यावरुनदेखील मोठा वाद झाला आहे.