‘अर्थसंकल्पाबाबत सरकार आणि सर्वसामान्य जनतेमध्ये फारसे गांभीर्य नसणे निराशाजनक’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 08:11 IST2026-02-05T08:10:25+5:302026-02-05T08:11:14+5:30
Budget 2026: सामाजिक न्यायाची भूमिका अर्थसंकल्पातून दूर गेली असून केवळ पैसा फेक तमाशा देख असे चित्र दिसत आहे, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

‘अर्थसंकल्पाबाबत सरकार आणि सर्वसामान्य जनतेमध्ये फारसे गांभीर्य नसणे निराशाजनक’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
मुंबई - पूर्वी अर्थसंकल्पावर मोठमोठ्या चर्चा होत असत आणि ते समजावून सांगितले जात असे पण आता बजेटच निरर्थक होत चालले आहे, बजेटची उत्सुकताच राहिलेली नाही आणि हे निराशाजनक व चिंताजनक आहे. राहुल गांधी यांनी बजेटचा हलवा कोणत्या समाज घटकाला मिळतो हे दाखवून दिले, ती सामाजिक न्यायाची टीपणी होती, ही सामाजिक न्यायाची भूमिका अर्थसंकल्पातून दूर गेली असून केवळ पैसा फेक तमाशा देख असे चित्र दिसत आहे, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पावर विशेष चर्चासत्र झाले. त्यात अर्थतज्ञ अजित जेाशी, संजीव चांदेारकर, एस. नागराजन, विश्वास उटगी, माजी खासदार कुमार केतकर यांनी भाग घेतला. यावेळी सपकाळ म्हणाले की, अर्थसंकल्पात भारताच्या वार्षिक प्रगतीचा व आपल्या जीवनावर होणाऱ्या परिणामाचा लेखाजोखा मांडला जातो, पण मागील काही वर्षात मात्र बजेटबद्दल सरकार व सर्वसामान्य जनतेमध्ये फारसे गांभीर्य दिसत नाही हे निराशाजनक चित्र आहे. अर्थव्यवस्थेकडे आपण जर असेच तटस्थपणे पाहू लागलो तर काळ आपल्याला माफ करणार नाही. शेतकरी, बेरोजगारी या विषयावर आंदोलने होत असतात आता अर्थसंकल्पावरही आंदोलन करायची वेळ येईल. पूर्वी ग्रामीण भागातील नेतृत्वाच्या प्रशासन व ध्येय धोरणे ठरवण्यावर पकड असायची व यामध्ये सामाजिक न्याय राखला जात होता पण हे चित्रही आता बदलेले आहे. यावरही पकड सैल झाल्याचे दिसत आहे. डॉ. मनमोहनसिंह यांच्या नंतर देशातील चित्र बदलले व वेगळेच लोक घुसले आहेत. ग्रामीण भागाचा पगडा होता तो संपला आहे, बहुजनांचा पगडाही संपला व त्याची जागा व या सर्वांवर दलालांची पकड मजबूत होत गेली ही चिंतेची बाब आहे.
दरम्यान, नुकत्याच नगरपालिका व महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीत प्रचंड पैसा व गुंडगिरीचा वापर केला गेला, हा दलालांनी सोडलेला पैसा पाहता त्याचे परिणाम किती गंभीर होतील याचे कोणालाच गांभिर्य नाही. आज भारतातील प्रत्येक माणूस पॅनिक आहे, एक चेहरा दाखवला होता तोही गायब आहे, योजनाही नाहीत. देशातील एकंदर परिस्थिती पाहता एखादी घटना होऊन ज्वालामुखीसारखा तो बाहेर येईल, अशी भीती वाटते असे सपकाळ म्हणाले.
