"जनतेला तुम्ही एवढं अडाणी कसं समजू शकता?" मारकडवाडीवरुन शरद पवारांना भाजपने सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 11:38 IST2024-12-07T11:34:46+5:302024-12-07T11:38:15+5:30
शरद पवार यांच्या मारकडवाडी दौऱ्यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे.

"जनतेला तुम्ही एवढं अडाणी कसं समजू शकता?" मारकडवाडीवरुन शरद पवारांना भाजपने सुनावलं
Sharad Pawar Markadwadi : सोलापुरातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्यावरुन नवं राजकारण सुरु झालं आहे. शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार यांच्या गटातर्फे ही मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र पोलिस प्रशासनाने एक जरी मतदान झाले तर गुन्हे दाखल करू, असा इशारा दिला. त्यानंतर आमदार जानकर यांनी स्थानिकाशी चर्चा करून ही चाचणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोध सुरु केला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी मारकडवाडीला भेट देणार आहेत. यावरुनच आता भाजपने शरद पवारांवर निशाणा साधला आहे. जनतेला तुम्ही एवढं अडाणी कसं समजू शकता असा सवाल भाजपने शरद पवारांना विचारला आहे.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या वापराला विरोध करत सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची तयारी केली होती. निवडणुकीत ईव्हीएमवर शंका घेत उत्तमराव जानकर गटाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी प्रशासनाकडे केली. मारकडवाडी गावकऱ्यांनी केलेल्या मतदान प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत नसल्याचा निर्वाळा प्रशासनाने दिला होता. पोलिसांनीही ग्रामस्थांना नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर उत्तमराव जानकर यांनी ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली. त्यामुळे आता शरद पवार व राहुल गांधी मारकडवाडीला जाणार असून तिथून लाँग मार्च काढणार असल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावरुन शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
"हा तर भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेला विरोध. मारकडवाडी सध्या बरेच चर्चेत आहे. शरद पवार गटाच्या पुढाकाराने बॅलेटपेपर वर मतदान घेण्याचे थोतांड करण्यात आले. याचं कौतुक नेहमीच भाजपा-मोदी-फडणवीस द्वेषाच्या तमाशात तुणतुणे वाजवणारे संजय राऊत व अर्बन नक्सल्यांनी केले आहे. आता शरद पवार व राहुल गांधी येथे भेट देऊन परत मागणी करणार असल्याचे शरद पवार गटाचे सांगत आहेत. असा कोणताही प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेच्या विरोधात असून घटनेचा हा अपमान आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना प्रत्येक संस्थेला काही जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. निवडणूका घेणे हे निवडणूक आयोगाचेच काम आहे. उद्या मला निकाल मान्य नाही म्हणून कुणी न्यायालय वेगळे सुरू करेल कोणी अजून वेगळे प्रकार करेल," असं केशव उपाध्ये म्हणाले.
"ईव्हीम निकाल तेव्हाच अमान्य होतो जेव्हा भाजपा जिंकतं. उदा लातूर शहरात अमित देशमुख जिंकले, तर ईव्हीम तक्रार नाही मात्र लातुर ग्रामीण मध्ये त्यांचं बंधू हरले व भाजपा जिंकले तर मात्र ईव्हीम मध्ये घोळ असतो. असला भंपकपणा जनता ओळखून आहे म्हणूनच विरोधकांना ती महत्व देत नाही. परवा मारकडवाडी येथे झालेल्या बॅलेट पेपरवर निवडणुक होणार या नाटकाची कल्पनाही तिथल्या ग्रामस्थांना नव्हती. मुलाखतीत तसं सगळ्यांनी स्पष्ट सांगितलं. म्हणजे महाविकास आघाडीचे नेते ग्रामस्थांना पुढे करून स्वतःच कुठंतरी शिक्के मारत बसणार, आणि EVM कसं खोटं आहे, हे सिद्ध करणार. जनतेला तुम्ही एवढं अडाणी कसं समजू शकता? याच जनतेनं विचार करून, ठरवून महायुतीला निवडून दिलं आहे. अनेक वेळा संधी देऊनही विरोधकांना ईव्हीएम विरोधात एक साधा पुरावा सुध्दा देता आला नाही, कारण मुळात दोष तुमच्या मानसिकतेत आणि विचारधारेत आहे," असंही केशव उपाध्येंनी म्हटलं.