कोणाला नेत्यांचे आदेश, तर कोणाला विनंती; लातूरात २४२ जणांची माघार, ३५९ उमेदवार रिंगणात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:33 IST2026-01-03T17:33:44+5:302026-01-03T17:33:52+5:30
लातूर महापालिकेच्या ७० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७५९ अर्ज दाखल झाले होते. छाननीत ६२ अर्ज बाद झाले होते.

कोणाला नेत्यांचे आदेश, तर कोणाला विनंती; लातूरात २४२ जणांची माघार, ३५९ उमेदवार रिंगणात!
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी १८ प्रभागांत तब्बल २४२ जणांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर एकूण ३६९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. दरम्यान, शनिवारी अपक्ष उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.
लातूर महापालिकेच्या ७० जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ७५९ अर्ज दाखल झाले होते. छाननीत ६२ अर्ज बाद झाले होते. उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी २ जानेवारीपर्यंतची मुदत होती. सर्वाधिक उमेदवार सर्वसाधारण जागेवर होते. त्यामुळे माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी प्रमुख पक्षांच्या नेत्यांसह उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनीही आपल्या उमेदवाराला अडचण होणार नाही, यासाठी विनवणी करीत काही जणांना माघार घ्यायला लावली. प्रमुख पक्षांतील काही उमेदवारांनी पक्षाचा एबी फॉर्म मिळाला नसल्याने अर्ज कायम ठेवायचा, असा निश्चय करून अर्ज ठेवला होता; मात्र नेत्यांचा आदेश आल्यानंतर आपल्याच पक्षातील उमेदवारांची अडचण व्हायला नको म्हणून अर्ज मागे घेतला असल्याचे चित्र दिसून आले. तर काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी मैदानात...
महापालिका निवडणुकीत भाजप ७०, काँग्रेस-वंचित आघाडी ७०, राष्ट्रवादी (अजित पवार) ६०, राष्ट्रवादी (शरद पवार) १९, एमआयएम ९ व इतर एकूण ३५९ उमेदवार आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. शनिवारी अपक्षांना चिन्हांचे वाटप झाल्यावर प्रचाराची रंगत वाढणार आहे. पक्षातील उमेदवारांची अडचण व्हायला नको म्हणून अर्ज मागे घेतला असल्याचे चित्र दिसून आले. तर काही ठिकाणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी करीत अर्ज कायम ठेवले आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे.
कोणत्या प्रभागात किती जणांनी घेतली माघार
उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २४२ जणांनी माघार घेतली. त्यात प्रभाग क्र. १ मधून २१, २ मधून १४, ३ मध्ये २५, ४ मध्ये ११, प्रभाग ५ मध्ये ९, प्रभाग क्र. ६ मध्ये १५, प्रभाग ७ मध्ये ६, ८ मध्ये १०, प्रभाग ९ मध्ये १०, प्रभाग १० मध्ये १०, प्रभाग ११ मध्ये १४, प्रभाग १२ मध्ये ८, प्रभाग क्र. १३ मध्ये १०, प्रभाग १४ व १५ मध्ये तब्बल ४४, प्रभाग १६ मध्ये २०, प्रभाग १७ मध्ये ७ तर प्रभाग क्र. १८ मध्ये ८ जणांनी माघार घेतली आहे. निवडणुकीत प्रभाग क्र. १४ व १५ मध्ये सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.