लातूर महापालिकेत अमित देशमुख यांचा करिश्मा! काँग्रेस-वंचित आघाडीची ऐतिहासिक मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 19:32 IST2026-01-17T19:30:22+5:302026-01-17T19:32:10+5:30
Latur Municipal Election Results 2026:मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील लातूर शहरात दिग्गज मानल्या जाणाऱ्या काही नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला.

लातूर महापालिकेत अमित देशमुख यांचा करिश्मा! काँग्रेस-वंचित आघाडीची ऐतिहासिक मुसंडी
- हणमंत गायकवाड
लातूर: विधानसभा निवडणुकीची जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलवून टाकत माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून नेतृत्वाचा करिष्मा पुन्हा एकदा दाखवून दिला. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने मिळविलेल्या अभूतपूर्व यशाने भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील लातूर शहरात दिग्गज मानल्या जाणाऱ्या काही नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. विरोधी बाकावरून सत्तापक्षात उडी घेत उमेदवारीही मिळवली. ही काँग्रेसला लागलेली गळती अशी टीका होत असताना अमित देशमुख मात्र शांतपणे जाणाऱ्यांना शुभेच्छा देत होते. त्यानंतर प्रत्यक्ष रणधूमाळीत प्रचाराचे काटेकोर नियोजन करीत शहर पिंजून काढले. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला ते ग्राऊंडवर उतरल्याचे दिसले. या प्रवासात त्यांना वंचित बहुजन आघाडीची निर्णायक साथ मिळाली
चुरशीच्या लढतीत काँग्रेस जिंकली
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री आ. अमित देशमुख हे कमी फरकाने विजयी झाले होते. त्यामुळे अलर्ट झालेली काँग्रेस मनपाच्या रणसंग्रामात पहिल्या दिवसापासून आक्रमक होती. गाजलेली भाषणे, आक्रमक प्रचार, सभांची गर्दी असे वातावरण काँग्रेसला टिकवता आले. भाजपनेही मुख्यमंत्र्यांपासून अनेक नेत्यांच्या सभांनी प्रचार ढवळून काढला.माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर या सर्वानीच काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.
रवींद्र चव्हाणांच्या विधानाने पीछेहाट !
लातूर महापालिकेत 'झिरो ते हिरो' असे यश संपादन करणारी भाजप २०२६ च्या निवडणुकीत मात्र मागे पडली. मात्र भाजपाच्या नेत्यांनी एकत्र मोट बांधून जोरदार टक्कर दिली. त्यांच्या लढाईत आत्मविश्वास होता. प्रचारही जोरदार सुरू होता. परंतु, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या एका विधानाने वारे फिरले. विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसण्याची भाषा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनाही रुचली नाही.
काँग्रेसच्या विजयाची, भाजपच्या पराभवाची कारणे
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र. काँग्रेसकडे अल्पसंख्याक मतांचे पाठबळ.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आठवण पुसल्या जातील हे वक्तव्य.
काँग्रेस नेतृत्वाचा संयम, बंद मागे घेण्याचे आवाहन.
अमित देशमुख यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न.
भाजपमधील कुरबुरी, स्थानिक भाजपकडे ना मंत्रिपद ना पालकमंत्री पद. सगळे बाहेरून येणार, असा काँग्रेसचा प्रचार.