Kolhapur Municipal Election 2026: जनसुराज्य मैदानात उतरताच अनेक बंडखोरांचे डोळे लकाकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 17:11 IST2025-12-26T17:10:08+5:302025-12-26T17:11:06+5:30
काही जाणकारांकडून हा रणनीतीचा भाग असावा अशी शंका

Kolhapur Municipal Election 2026: जनसुराज्य मैदानात उतरताच अनेक बंडखोरांचे डोळे लकाकले
कोल्हापूर : महायुतीतील घटक पक्ष असतानाही महानगरपालिका निवडणुकीत सोबत न घेतल्यामुळे स्वतंत्र लढण्याच्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या भूमिकेमुळे कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘जनसुराज्य’चा हा दावा खरा आहे की, तो एक राजकीय रणनीतीचा भाग आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. राज्यातील सत्तेत भाजपसोबत शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, जनसुराज्य शक्ती पक्ष एकत्र आहेत. महापालिका निवडणुकीत मात्र भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट असे तीन प्रमुख पक्ष एकत्रित निवडणुकीस सामोरे जात आहेत. निवडणूक जाहीर होईपर्यंत कोणताच गवगवा नसलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाने अचानक उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होत असताना पक्षाच्या वतीने स्वतंत्र निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
वाचा : ‘त्या’ राष्ट्रवादीत आता कोणी शक्तिशाली राहिले नाही - हसन मुश्रीफ, विनय कोरेंबाबत म्हणाले..
जनसुराज्य शक्ती पक्षाच्या या भूमिकेने राजकीय क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीची कोणतीही पूर्वतयारी नाही, कार्यकर्त्यांचे मेळावे नाहीत की पक्षाच्या नेत्यांकडून निवडणूक लढविण्याविषयी कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. शिवाय घटक पक्षांच्या नेतेमंडळींशी कसलीच चर्चाही झाली नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी काही दिवस अचानक पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यांच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
गेले दोन दिवस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. काही इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. स्वतंत्र लढण्याइतके उमेदवार अन्य राजकीय पक्षांसह ‘जनसुराज्य’कडेही नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तरीही स्वतंत्र लढण्याचा निर्णय आश्चर्यचकित करणारा आहे. त्यांच्या भूमिकेमुळे काही प्रश्नही उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
काही जाणकारांकडून हा रणनीतीचा भाग असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. महायुतीतील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादीकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उमेदवारीचा घोळ निर्माण झाला आहे. जागावाटपात एकमत होण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत. सर्व जागांवर एकमत झाले नाही तर बंडखोरीचा धोका मोठा आहे. बंडखोरी झाली तर महायुतीला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे नाराज उमेदवारांना ‘जनसुराज्य’चा पर्याय असावा, ही निवडणूक लढविण्यामागची भूमिका असावी, असे सांगितले जाते. शिंदेसेनेकडे उमेदवारी मिळणार नाही म्हणून दोन माजी नगरसेवक बाहेर पडले आहेत. त्यातील एक जनसुराज्यच्या व्यासपीठावर दिसला तर दुसरा उद्धवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
‘जनसुराज्य’ने दोन महापौर दिले
जनसुराज्य शक्ती पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सई खराडे व उदय साळोखे असे दोन महापौर दिले. खराडे यांना महादेवराव महाडिक यांनी महापौर केले; पण राजीनामा द्यायची वेळ आल्यावर त्या जनसुराज्य पक्षात गेल्या.