Maharashtra Vidhan Sabha 2019 : पर्यावरणपूरक कोल्हापूरची साद देत ऋतुराज पाटील यांनी भरला अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 14:57 IST2019-10-03T14:33:28+5:302019-10-03T14:57:24+5:30
काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज गुरुवारी सायकल रॅली काढून साधेपणाने भरला. या रॅलीद्वारे त्यांनी पर्यावरणपूरक आणि सदृढ कोल्हापूर करण्याबाबतची साद दिली. त्यामध्ये युवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे आहेत. त्यांची या निवडणुकीत भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यासमवेत लढत होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 : पर्यावरणपूरक कोल्हापूरची साद देत ऋतुराज पाटील यांनी भरला अर्ज
कोल्हापूर : काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारी अर्ज गुरुवारी सायकल रॅली काढून साधेपणाने भरला. या रॅलीद्वारे त्यांनी पर्यावरणपूरक आणि सदृढ कोल्हापूर करण्याबाबतची साद दिली. त्यामध्ये युवक, काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे ऋतुराज हे पुतणे आहेत. त्यांची या निवडणुकीत भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्यासमवेत लढत होणार आहे.
येथील दसरा चौकात उभारलेल्या व्यासपीठावर शाहीर दिलीप सावंत यांनी भाजप सरकारच्या विरोधातील पोवाडा सादर केला. त्यानंतर ऋतुराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केले. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय. डी. पाटील, प्रतिमा सतेज पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, सुरेश कुऱ्हाडे, शारंगधर देशमुख, बबनराव रानगे, सरलाताई पाटील, सागर चव्हाण, आदी उपस्थित होते.
साडेअकराच्या सुमारास सायकल रॅली सुरु झाली. त्यात चालत देखील कार्यकर्ते सहभागी झाले. व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड, उद्योगभवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली आली. तेथून ऋतुराज यांनी आमदार पाटील, माजी आमदार पी. एन. पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे अर्ज सादर केला.