Kolhapur: इचलकरंजीत महापौरांना विरोधकांनी घेरले; सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांनाच साथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:52 IST2026-02-21T12:52:29+5:302026-02-21T12:52:53+5:30
महापौर बंगला उभारावा

Kolhapur: इचलकरंजीत महापौरांना विरोधकांनी घेरले; सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांनाच साथ
इचलकरंजी : प्रशासकीय कार्यकाळातील इतिवृत्तावर विरोधकांनी महापौरांना घेरल्यानंतर सत्ताधाऱ्यांनीही तोच राग आळवत महापौरांवर प्रश्नांचा भडीमार केला. विरोधकांची भूमिका सत्ताधाऱ्यांनीच पार पाडत विरोधकांना बळ दिल्याचा प्रकार शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या महासभेत समोर आला. पीठासन अधिकारी महापौर उदय धातुंडे होते.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नगर सचिव राहुल पोटे यांनी मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्याचा विषय वाचल्यानंतर विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील यांनी आक्षेप घेत प्रशासन काळातील इतिवृत्तही वाचले जावेत, त्या काळातील घेतलेले निर्णय समोर आणण्याची मागणी केली. आपणास काही माहिती हवी असेल, तर त्यासंदर्भात तीन दिवस अगोदर पत्र देणे गरजेचे असल्याचे पीठासन अधिकारी धातुंडे यांनी सांगितले. यावर समाधान न झालेले पाटील यांनी आपल्याला बोलण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. पीठासन अधिकाऱ्यांनी आपणास या सभेत उत्तर देणे बंधनकारक नसल्याचे सांगितले.
रवींद्र माने यांनी मागील काळात झालेल्या कामांमुळे आम्हाला बट्टा लागता कामा नये, असे नमूद केले. चार वर्षांच्या प्रशासकीय काळातील कामांची मागणी रवी रजपुते यांनी केली. प्रदीप धुत्रे यांनीही हीच मागणी लावून धरली. या चर्चेत सयाजी चव्हाण, रणजित जाधव यांनीही हाच विषय उचलून धरला. ज्या कारणासाठी सभा बोलावली आहे, त्या विषयावर सभेचे कामकाज करण्याची मागणी विठ्ठल चोपडे यांनी केली. सुमारे अर्ध्या तासाहून अधिक काळ एकाच विषयावर चर्चा सुरू राहिली. विद्या साळुंखे यांनी नगरसेविकांसाठी स्वतंत्र दालन करण्याची मागणी केली.
त्यानंतर पीठासन अधिकाऱ्यांनी स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा करण्याचा निर्णय घेतला. त्यावरही पाटील यांनी आक्षेप घेतला. आपण १८ फेब्रुवारीपूर्वी नावे दिली आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांनी आज नावे दिली आहेत. इतके दिवस नावे देण्याचा घोळ का सुरू होता? आजी-माजी आमदारांमधील मतभेदांमुळे ही वेळ आली का? अशी विचारणा पाटील यांनी केली. त्यावर चोपडे यांनी उत्तर देताना कोणत्या पक्षात काय चालले आहे, ते जाणून घेण्याचा आपणास अधिकार नाही. सत्ताधाऱ्यांनीही वेळेतच अर्ज केल्याचे नमूद केले. ध्रुवती दळवाई यांनी ८ मार्चला महिला दिन साजरा करण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली.
सभेच्या सुरूवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुखवट्याचा ठराव चोपडे यांनी मांडला व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्याबरोबरच काही अभिनंदनाचे ठरावही मांडण्यात आले. महानगरपालिकेला ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्ये पुरस्कार मिळाल्याचा ठरावही या सभेत मांडण्यात आला. सभेमध्ये राजू बोंद्रे, मदन कारंडे, तानाजी पोवार, आदींनी भाग घेतला. सभेसाठी उपमहापौर अनिल डाळ्या, आयुक्त पल्लवी पाटील उपस्थित होते.
महापौर बंगला उभारावा
महापौरांचा बंगलाही उभारण्याची मागणी रजपुते यांनी केली. महापौर किती कालावधीचा आहे, यापेक्षा त्या पदाची प्रतिष्ठा व्हावी, यासाठी बंगला असणे गरजेचे असल्याचे कारंडे यांनी नमूद केले. यावर जागा सुचवण्याची विनंती आयुक्तांनी केली. पोवार यांनी महापौर बंगल्याचे अंदाजपत्रक तयार करून बांधकाम करण्याची सूचना केली.