कल्याण-डोंबिवलीतील घडामोडीवरून ठाकरे बंधूमध्ये विसंवाद; निवडणूक होताच वेगळ्या दिशेने वाटचाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 12:23 IST2026-01-22T12:23:04+5:302026-01-22T12:23:43+5:30
ठाकरे बंधूंची वाटचाल वेगवेगळ्या दिशेने सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

कल्याण-डोंबिवलीतील घडामोडीवरून ठाकरे बंधूमध्ये विसंवाद; निवडणूक होताच वेगळ्या दिशेने वाटचाल
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत ठाकरे बंधूंनी महापालिका निवडणुकीसाठीच्या युतीची घोषणा केली. शिंदेसेनेविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोकाचा प्रचार केला. मात्र, कल्याण-डोंबिवलीत उद्धवसेनेच्या दोन नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केला. तर, कल्याण-डोंबिवलीच्या महापौरपदासाठी शिंदेसेनेला राज यांच्या मनसेने जाहीर पाठिंबा दिला. यामुळे ठाकरे बंधूंची वाटचाल वेगवेगळ्या दिशेने सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निवडणुकीच्या आधी एकत्रितपणे रणनीती निश्चित करणारे ठाकरे बंधूंची निकालानंतरच्या परिस्थितीमध्ये काय करायचे याबाबत दोघांमध्ये चर्चा झालेली नव्हती का, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तसेच, अमरावती आणि अकोला येथे उद्धवसेनेचे नगरसेवक भाजपसोबत जात असल्याचे दिसत आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या या राजकीय घटनेचे पडसाद मुंबईत उमटले. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा विषय अत्यंत गांभीर्याने घेतला आहे, असे खा. संजय राऊत म्हणाले. राज ठाकरेंशी चर्चा झाली आहे. ही माझ्या पक्षाची भूमिका नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. काही मिळाले नाही तर सोडून जातो, अशा मानसिकतेत काही जण आहेत. पण, प्रत्येकाला काही देऊ शकत नाही, ही त्यांची भूमिका असल्याचे राऊत यांनी सांगितले.
पक्षाच्या मूळ धोरणाविरोधात कोणत्याही पक्षाचे स्थानिक नेतृत्व विपरित भूमिका घेत असल्यास पक्ष नेतृत्वाने कारवाई केली पाहिजे. आमच्यासाठी शिंदे हे एमआयएम आहेत. त्यांच्याशी राजकीय किंवा कोणतेही अन्य संबंध ठेवायचे नाहीत. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत.
-खा. संजय राऊत, नेते उद्धवसेना
महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आल्याच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच कल्याण-डोंबिवलीत मनसेने उद्धवसेनेची साथ सोडली. उद्धवसेनेच्या नगरसेवकांनीही ‘जय महाराष्ट्र’ केला. पत्त्यातील बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो.
-केशव उपाध्ये, मुख्य प्रवक्ते प्रदेश भाजप
जो निर्णय आहे तो स्थानिक नेतृत्वाला घेण्याचा अधिकार राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे जनतेच्या हितासाठी जो निर्णय योग्य वाटला तो राजू पाटील यांनी घेतला आहे. चंद्रपूरमध्ये उद्धवसेनेने भाजपला पाठिंबा दिला. तो त्यांनी स्थानिक निर्णय घेतला, तसा आम्ही इथे घेतला. आमच्याविरोधात ८ उमेदवार उद्धवसेनेचे होते.
-संदीप देशपांडे, मनसे नेते