‘केडीएमसी’मध्ये भाजप युतीवर ठाम! भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:27 IST2026-01-22T08:24:24+5:302026-01-22T08:27:15+5:30
कोणी, कितीही डाव टाका. शेवटी सोंगट्या आमच्याच हातात आहेत, असे भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.

‘केडीएमसी’मध्ये भाजप युतीवर ठाम! भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्ली दौऱ्यावर रवाना
लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: मनसेला सोबत घेऊन शिंदेसेनेने कल्याण-डोंबिवलीच्या सत्ता स्थापनेत ‘ट्विस्ट’ आणला असला तरी भाजपचे नेते मात्र अजूनही युतीचा महापौर बसेल, असे सांगत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून ते गुरुवारी ठाणे जिल्ह्यात माघी गणेशोत्सवानिमित्त विविध ठिकाणी जाणार असल्याचे सांगण्यात आले.
भाजपचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी सांगितले की, मनसेने महायुतीला पाठिंबा दिला असून युतीचा महापौर होणार हे ठरले आहे, त्यामुळे युतीच्या दोन्ही घटक पक्षांना काळजी करण्याचे कारण नाही. दरम्यान, रवींद्र चव्हाण दिल्लीला असल्याने त्यांची यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही. कोणी, कितीही डाव टाका. शेवटी सोंगट्या आमच्याच हातात आहेत, असे भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले.
भविष्यात काहीही होऊ शकते: बाळा नांदगावकर
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक लोक आघाडी युती करतात. मनसे नेते राजू पाटील यांनीही अंतर्गत ॲडजस्टमेंट केली असावी. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राजकारणात नवीन नाहीत. राजकारणात कधी काहीही होऊ शकते. कोणीही मित्र-शत्रू नसतो, असा सूचक इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी बुधवारी दिला. कल्याण डोंबिवली पालिकेच्या मनसे व शिंदेसेनेच्या युतीवर नेते नांदगावकर यांनी प्रतिक्रिया देताना पंतप्रधान वाजपेयी यांनी शतप्रतिशतचा नारा दिला होता. अनेक पक्ष हा नारा देतात. कल्याण-डोंबिवलीत भाजप शिवसेनेचे बिनसले असावे. त्यामुळे तडजोडी झाल्या. काही गोष्टी पडद्यामागे चालत असतात तेव्हा त्या बोलायच्या नसतात, असे सांगितले.