जालन्यात ६१ टक्के मतदान : नेत्यांसह उमेदवारांचा जीव टांगणीला, आज होणार फैसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:20 IST2026-01-16T11:16:06+5:302026-01-16T11:20:04+5:30
बोगस मतदान प्रकरणात एकावर गुन्हा, एक जण ताब्यात

जालन्यात ६१ टक्के मतदान : नेत्यांसह उमेदवारांचा जीव टांगणीला, आज होणार फैसला
जालना : जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत गुरुवारी १५ जानेवारी रोजी ६१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बोगस मतदानाचा प्रयत्न केल्या प्रकरणात एकाविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. मतमोजणी शुक्रवार, १६ जानेवारी रोजी होणार असून, नेत्यांसह उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.
जालना महानगरपालिकेची १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी प्रथमच निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजप, शिंदेसेना स्वबळावर लढत असून, राष्ट्रवादीने (अजित पवार) मनसेसोबत युती केली आहे, तर महाविकास आघाडीची एक मोट मात्र कायम आहे. प्रचाराची रणधुमाळी शमल्यानंतर उमेदवारांसह नेत्यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष गाठी-भेटींवर भर दिला होता. शहरातील २९१ मतदान केंद्रांवर गुरुवार, १५ जानेवारी रोजी सकाळी ७:३० वाजता मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळी ९:३० वाजेपर्यंत मतदानाची गती संथ होती. नंतर हळूहळू मतदारांची गर्दी मतदान केंद्रांवर झाली. सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.
बोगस मतदानाचा प्रयत्न
कचेरी रोडवरील बुथ क्रमांक १४/१२ मध्ये अब्दुल मलिक अब्दुल बारी (रा. अंबडनाका, जालना) यांचे डमी मतदान कार्ड वापरून रहिस पठाण इसार पठाण (वय-२५, रा. मोहमदियानगर, सिल्लोड) हा आला. मतदान अधिकाऱ्यांनी बोगस मतदानाचा प्रकार ओळखून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात डॉ. कृष्णा देशपांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रहिस पठाण विरुद्ध कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर प्रभाग ९ ड मध्ये एका व्यक्तीने बोगस मतदान केल्याची तक्रार उमेदवाराने केली होती. डीवायएसपी अनंत कुलकर्णी व सहकाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी उशिरापर्यंत सुरू होती.