Maharashtra Election 2019 ; ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 06:00 IST2019-10-05T06:00:00+5:302019-10-05T06:00:26+5:30
राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच शुक्रवार (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बम्पर भर्ती दिसून आली.

Maharashtra Election 2019 ; ७६ उमेदवार निवडणूक रिंगणात
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.४) जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण ७६ उमेदवारांनी ११२ अर्ज दाखल केले. त्यामुळे सध्यातरी निवडणुकीच्या रिंगणात ७६ उमेदवार आहेत. मात्र सोमवारपर्यंत (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेता येणार असल्याने सोमवारीच निवडणुकीच्या रिंगणातील लढवय्यांचा खरा आकडा स्पष्ट होणार आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक आता रंगात आली असून २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यानुसार, गुरूवारपर्यंत (दि.३) जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांसाठी २७ उमेदवारांनी ३३ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातच शुक्रवार (दि.४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने बम्पर भर्ती दिसून आली. शुक्रवारी जिह्यातील चारही विधानसभा मतदारसंघांसाठी ७६ उमेदवारांनी ११२ अर्ज दाखल केले.
विधानसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी बघितल्यास, (६३) अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून २१ उमेदवारांनी ३२ उमेदवारी अर्ज, (६४) तिरोडा विधानसभा मतदारसंघातून १८ उमेदवारांनी २२ उमेदवारी अर्ज, (६५) गोंदिया विधानसभा मतदारसंघातून २७ उमेदवारांनी ४३ उमेदवारी अर्ज तर (६६) आमगाव विधानसभा मतदारसंघातून १० उमेदवारांनी १५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
विशेष म्हणजे, जिल्ह्यातील राजकारणाचा गड असलेल्या गोंदिया विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक २७ उमेदवारांनी ४३ अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढण्याची आपली इच्छा जाहीर करणाऱ्यांचा हा आकडा आहे. मात्र आता सोमवारी (दि.७) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यानंतर रिंगणात लढविणार खरा आकडा पुढे येणार.
बंडखोरांनी वाढविले टेंशन
पक्षांकडून तिकीट नाकारण्यात आल्याने काहींनी अपक्ष म्हणून तर काहींनी अन्य पक्षांचा हात धरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे दिसून येत आहे. यामुळे अशा बंडखोरांची संख्या वाढली असून राजकीय पक्षाच्या तिकीटवर लढत असलेल्या उमेदवारांचे टेंशन वाढविले आहे. हे बंडखोर रिंगणात राहिल्यास मत कापून फटका बसविणार असल्याने आता त्यांची मनधरणी करण्याचे प्रकार घडणार आहेत.यासाठी त्यांना प्रलोभन देऊन त्यांचे मन वळविण्यात येणार यात शंका नाही.