खरीप हंगामात ९७ हजार मेट्रिक टन खताची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:28 IST2025-05-06T16:28:17+5:302025-05-06T16:28:50+5:30
कृषी विभागाने नोंदविली मागणी : शेती कामात शेतकरी व्यस्त

Demand for 97 thousand metric tons of fertilizer in the Kharif season
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : खरीप हंगाम दीड महिन्यावर आला असून, कृषी विभागाकडून खरीप हंगामपूर्व तयारी सुरू झाली आहे. यंदाच्या हंगामासाठी कृषी विभागाने शासनाकडे ९७हजार ३५३ मेट्रिक टन रासायनिक खताची मागणी नोंदविली आहे. खरिपासाठी जिल्ह्यातील शेतकरी आता शेतात घाम गाळताना दिसून येत आहे. जिल्ह्यात आगामी खरीप हंगामात २ लाख १३ हजार ७६० हेक्टर क्षेत्रात भात, ५ हजार २१२ हेक्टर क्षेत्रात तूर यासह अन्य मूग, उडीद ऊँचा आदी पीक घेण्याचे प्रस्तावित आहे. दरवर्षी मृग नक्षत्राला सुरुवात होताच शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला सुरुवात होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून पेरणीपूर्वीच रासायनिक खताच्या खरेदीचे नियोजन केले जाते. ही बाब लक्षात घेऊन कृषी विभागाकडून मार्चपूर्वीच खतांच्या मागणीचा आढावा घेत खरीप हंगामासाठी रासायनिक खते, कीटकनाशके आणि बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयास कळविली आहे. त्यानुसार कृषी विभागाने २०२५-२६ खरीप हंगामासाठी ९७ हजार ३५३ मे. टन रासायनिक खताची मागणी नोंदविली आहे.
गतवर्षीच्या कोट्यातील २९ हजार मे. टन खत शिल्लक
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी सरासरी ९७हजार ३५३ मे. टन. रासायनिक खताचा वापर केला जातो. कृषी विभागाने त्यानुसार २७ हजार ३५३ मे. टन रासायनिक खताची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंद केली आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी खताची मागणी नोंदवली असली तरी गतवर्षीच्या कोट्यातील २९ हजार ७८ मे. टन खत शिल्लक आहे. यात युरिया २०१९ मे. टन., डी.ए.पी. ५०९ मे. टन., एमओपी १६३ मे. टन., एस.एस.पी.८२७६ मे. टन., संयुक्त खते ११०२९ मे. टन खतांचा समावेश आहे.
५१ हजार क्विंटल बियाणाची गरज
जिल्ह्यात खरीप हंगामात जवळपास २ लाख १९ हजार ३३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यासाठी कृषी विभागाने ५१ हजार ७६८ क्विंटल बियाणांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे केली आहे.
शेती कामांना आला वेग
शेतकरी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करून ठेवण्यात मग्न आहेत. नांगरणी, काडीकचरा वेचणी, काटेरी झुडपे तोडणे आदी कामे केली जात आहेत. उन्हामुळे सकाळ व सायंकाळच्या 3 वेळी शेतकरी शेतात काम करीत असल्याचे दिसून येत आहेत.