एटीएमने पैसे काढण्यासाठी आता बँक घेणार २५ रुपये सेवा शुल्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 17:39 IST2025-04-12T17:38:48+5:302025-04-12T17:39:23+5:30
Gondia : ३ नंतर प्रत्येक व्यवहारावर सेवाशुल्क, १८ टक्के जीएसटी

Banks will now charge Rs 25 for ATM withdrawals
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : एटीएममधून रोख रक्कम काढण्यासाठी आता तुम्हाला जास्तीचे सेवाशुल्क व त्यावर १८ टक्के जीएसटी द्यावी लागणार आहे, हे वाचून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. कारण, आता एटीएम कार्डचा वापर करताना दहादा विचार करावा लागेल. काही बँका तर पासबुक भरल्यास नवीन पासबुकसाठी भरमसाट पैसे घेत आहेत. तुमचे खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळेस एटीएमचे व्यवहार विनाशुल्क असतील. एटीएमने कधीकाळी मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होत होती. परंतु, मागील काही वर्षापासून डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहेत. क्यूआर कोड आल्यामुळे व्यवहार डिजिटल झाले असले तरी रोख रक्कम काढण्यासाठी आजही एटीएमला पर्याय नाही.
किती व्यवहारानंतर लागेल सेवाशुल्क ?
- तुमचे ज्या बँकेत खाते व एटीएम आहे, त्या बँकेऐवजी दुसऱ्या बँकेची रोख रक्कम काढण्यासाठी ३ वेळेस सेवाशुल्क लागणार नाही. मात्र, त्यानंतर चौथ्या व्यवहारापासून पुढील प्रत्येक व्यवहारावर २१ रुपये सेवाशुल्क व त्यावर १८ टक्के जीएसटी असे २५ रुपये बँक वसूल करेल.
- ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्याच बँकेच्या एटीएमवरून रोख रक्कम काढताना ५ वेळेस सेवाशुल्क लागणार नाही. मात्र, त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारावर २५ रुपये बँक वसूल करेल.
- पूर्वीही एटीएममधून रक्कम काढल्यास सेवा शुल्क १७रुपये लागत असे. जीएसटीसह २० रुपये आकारले जात होते.
मिनिमम बॅलन्स नसेल तर लागेल दंड
बँक कमीत कमी किती रक्कम ? बचत खाते दंडाची रक्कम (तीन महिने)
बँक ऑफ महाराष्ट्र २००० १०० ते ३०० रु.
बँक ऑफ बडोदा २००० १२० रु.
स्टेट बँक ऑफ इंडिया १००० दंड नाही
एचडीएफसी १०००० ५० ते ६०० रु.
कॅनरा बँक १००० ५० ते ३०० रु.
बँकांकडून सर्वसामान्यांची होतेय लूट
सेवाशुल्काच्या नावाखाली बँका लुटत आहेत. मिनिमम बॅलन्सवर दंड, एटीएमवर व्यवहारावर सेवाशुल्क, चेक बाउन्स झाल्यास बँकांची दंडाची रक्कम एकसारखी पाहिजे. पण, बँका 'मेरी मर्जी' प्रमाणे वेगवेगळे दंड आकारत आहेत. खातेदार बँकेत पैसे ठेवतो म्हणजे गुन्हा करतो काय, असेच आता वाटत आहे. असे सेवाशुल्क दंड वसूल करून बँका नफा कमवीत आहेत. हे चुकीचे आहे. आरबीआयने यावर कठोर भूमिका घेतली पाहिजे.