Dia Mirza:बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दिया मिर्झाने (Dia Mirza) तिच्या अभिनयाने एक काळ गाजवला. २००१ मध्ये आलेल्या 'रहना है तेरे दिल में' या सिनेमातून तिने इंडस्ट्रीत पाउल ठेवलं. त्यानंतर अभिनेत्रीने बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण, तिच्या अभिनयासह दिया मिर्झा समाजकार्य आणि बेधडक वक्तव्यांमुळे कायम चर्चेत येते. दिया मिर्झा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी आवर्जून सहभागी होत असते. पर्यावरण आणि निसर्गाच्या रक्षणासाठी ती दीर्घकाळापासून आवाज उठवत आहे. दरम्यान, नुकतीच अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मुंबईतील वायू प्रदूषणाच्या समस्येकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे.
सध्या मुंबई शहरातील वायू प्रदूषणाचा प्रश्न जटिल होत असून दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली आहे. या समस्येबद्दल आता बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईतील रोजचा हवेची गुणवत्ता ढासळते आहे. त्यामुळे अनेक श्वसनाचे आजार देखील तोंडवर काढत आहेत. याबाबत एक्स अकाउंटवर दियाने पोस्ट शेअर करुन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना टॅग केलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्रीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करत या पोस्टमध्ये लिहिलंय की, "मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई आणि महाराष्ट्रातील वाढतं वायू प्रदूषण हे मुलांची फुफ्फुसे आणि आरोग्यासाठी हानिकारक आहे. एक आई म्हणून मी तुम्हाला विनंती करते की कृपया तुम्ही या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्या." अशा आशयाची पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
वर्कफ्रंट-
दिया मिर्झा ही बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या गोड आवाजाने आणि सौंदर्याने तिनं चाहत्यांची मनं जिंकली. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत तिने 'लगे रहो मुन्ना भाई', 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' तसेच 'संजू' यांसारखे दमदार चित्रपट तिने बॉलिवूडला दिले.