Lok Sabha Election Result 2024 : अयोध्येला कमळ नको, सायकल का हवी?

By Meghana.dhoke | Published: June 8, 2024 09:58 AM2024-06-08T09:58:06+5:302024-06-08T09:58:45+5:30

Lok Sabha Election Result 2024 : स्थानिकांच्या जमिनी घेऊन योजलेल्या अजस्त्र विकासकामांविषयी अयोध्येतल्याच माणसांना वाटू लागलेली चीड हे रामाच्या नगरीत भाजपच्या पराभवाचे खरे कारण आहे!

Lok Sabha Election Result 2024 : Ayodhya does not want lotus, why does it need bicycle? | Lok Sabha Election Result 2024 : अयोध्येला कमळ नको, सायकल का हवी?

Lok Sabha Election Result 2024 : अयोध्येला कमळ नको, सायकल का हवी?

- मेघना ढोके
(संपादक, लोकमत सखी डॉट कॉम) 

‘यहां आकर देखिए, विकास का अतिशयोक्ती है, हमे तो इस विकास का डर लग रहा है !’ - लोकसभा निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी  अयोेध्येतले अग्रवाल चाचा फोनवर सांगत होते. फैजाबाद मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर अयोध्यावासीयांना ट्रोल करणाऱ्या अनेकांना प्रभू रामाच्या नगरीने दिलेले हे खरे उत्तर आहे ! अग्रवाल चाचा म्हणाले, ‘विकास और विनाश यहां साथ साथ चल रहे, ये और बात है की अयोध्यावासी बोला भी तो सुनता कोई नहीं!’

अवघ्या भारतवासीयांचा ऊर अभिमानाने भरून आणणारे भव्य राममंदिर जिथे उभे आहे, त्या अयोध्येचा समावेश असणाऱ्या फैजाबाद मतदारसंघात भाजपला अपयशाचा सामना करावा लागेल, असे (अयोध्यावासीय वगळता) कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते, पण चार जूनला तसे घडले. ज्या मुद्द्यावर आपण अख्खी निवडणूक तारून नेऊ असे भाजपला वाटले होते, तोच मुद्दा बाजूला ठेवत अयोध्यावासीयांनी कमळाची साथ सोडून सायकलवर स्वार होणे पसंत केले.

असे का झाले?- स्थानिक प्राथमिकतांकडे दुर्लक्ष, स्थानिकांची घरे-दुकाने-शेतजमिनी यांचे अधिग्रहण करून  अजस्त्र विकासकामांविषयी अयोध्येतल्याच माणसांना वाटू लागलेली चीड, सर्वसामान्यांच्या रोजीरोटीची साधने हिरावून शहरातून आलेल्या इंग्रजी बोलणाऱ्या झकपक प्रोफेशनल्सलाच फक्त ‘जॉब’ मिळतील अशा विचित्र शहरकेंद्री विकासाचे प्रारूप आणि भाजप खासदार लल्लू सिंह यांचे अयोध्येतल्या नागरिकांच्या असंतोषाकडे झालेले दुर्लक्ष.

मंदिर निर्माण कार्य सुरू झाले तेव्हा अयोेध्येतील प्रत्येक माणूस खुश होता. ‘सालों बाद राम जी घर लौटेंगे’ म्हणत जो तो आपल्या शहरात नव्याने होऊ घातलेल्या बदलाचे स्वागत करत होता. रस्ता रुंदीकरणात जी घरे-दुकाने जाणार त्यावर मार्किंग झालेले होते. ‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकासाठी या बदलत्या अयोध्येचे रूप टिपायला आम्ही गेलो तेव्हा (२०२१) अनेकजण स्वत:हून त्या खुणा दाखवून सांगत, हा आमचा भाग जाईल. पण नुकसानभरपाई मिळेल...रामजी के घर लिए हम भी सहयोग करेंगे! 

ही सहयोगाची भावना प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन मतदान जवळ येता येता बदलली. त्याचे कारण जुनी अयोध्या पुसून तयार होणाऱ्या नव्या चकचकाटी गावात आपल्याला काही स्थानच उरलेले नाही असे गोरगरीब स्थानिकांना वाटू लागले. मोठ्या गाड्या, त्यातून उतरणारी नोकरशाही, त्यांचे इंग्रजी नियोजन, रामपथ, १४ कोसी परिक्रमा मार्ग, सुशोभीकरण यासाठी धडाधड तोडली जाणारी घरे. अनेकांची घरे तुटली, अनेकांची दुकाने. सतत सांगितले जात होते, हाच ‘विकास’ आहे !  तिथून सुुरू झाला ‘विकास का डर’, लोकांना भीती वाटू लागली की आज शेजाऱ्याचे घर गेले, उद्या आपले गेले तर? नुकसानभरपाईचे, पुनर्वसनाचे दावे प्रशासनासमोर.  सरकारच्या दारात गरीब माणसे लाचार उभी.

अयोध्येत लोक म्हणतात, हमारे यहां नोकरशाही का आतंक है ! प्रशासनालाच इतकी सत्ता देण्यात आली की ते कुणालाच जुमानेनासे झाले. माणसे महत्त्वाची नव्हती, महत्त्वाचा होता डेटा आणि बदलत चाललेल्या अयोध्येचे जगाला दाखविण्यात येणारे चित्र. अशावेळी आपल्या माणसांना मदत न करता भाजप खासदार अलिप्त राहिले. लोकांना टाळू लागले. लोक त्यांना ‘घमंडी’ म्हणू लागले.
‘सांड का प्रकोप’ ही आणखी एक दहशत. भाकड झालेली जनावरे पोसायची ऐपत नसल्याने ती रस्त्यावर येतात. प्रशासनाने गोशाळा केल्या. व्हीआयपी दौरे लागले की ते ही मोकाट जनावरे गोशाळांमध्ये बांधून घालतात. व्हीआयपी परतले की जनावरे मोकाट. हा गंभीर प्रश्न न सोडवता  प्रशासन लोकांनाच नावे ठेवणार. तुमच्या गावाला विकासाची कदर नाही म्हणत पदोपदी अपमान करणार. ‘भाकड जनावरांना खायला कुठून घालू, आमच्याच हातांना रोजगार नाही’ अशी दाद मागणाऱ्यांना कुणी दारातही उभे केले नाही.

अयोध्या-फैजाबाद शहरात हे घडत असताना बाकी ग्रामीण भागात तर आयाबाया पाण्यासाठी वणवण करतच होत्या. विकास लांबून पाहणाऱ्या त्यांच्या घरात मात्र ‘उजाला’ पोहोचलाच नाही. ‘दस साल में महिलाओंके लिए कूछ नहीं किए’ असे त्यांचे मत. काहींना प्रधानमंत्री निवास योजनेतून घरे मिळाली, रस्ते गावापर्यंत येऊ लागले; पण रोजगार नसल्याचे प्रश्न तसेच राहिले. तरुण मोठ्या प्रमाणात नाराज होते. त्यात लल्लू सिंह मिल्कीपूरच्या जाहीर सभेत म्हणाले की भाजपला ४०० जागा मिळाल्या, तर आम्ही संविधान बदलू. तो व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. दलित आणि ओबीसींची मते लल्लू सिंह यांच्याविरोधात एकवटली.

मुस्लीम मतदान भाजपच्या विरोधात गेलेच होते. फैजाबाद-अयोध्या मतदारसंघात सपाला मतदान झाले ते लल्लू सिंह यांच्याबद्दलच्या प्रचंड नाराजीमुळेच ! हा उमेदवार बदला असे कळवळून सांगणाऱ्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचे पक्षधुरिणांनी ऐकले नाही ! स्थानिक माणसांना विश्वासात न घेता, त्यांच्या अपेक्षांचा विचार न करता विकासकामांच्या नावाखाली जिथे-तिथे फिरलेला बुलडोझरच अयोध्येत सायकलला विजयी करून गेला ! 

Web Title: Lok Sabha Election Result 2024 : Ayodhya does not want lotus, why does it need bicycle?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.