रक्ताळलेल्या जखमांचा खेळ नवा !

By सचिन जवळकोटे | Published: April 4, 2021 06:49 AM2021-04-04T06:49:19+5:302021-04-04T06:50:10+5:30

लगाव बत्ती..

The game of bloody wounds is new! | रक्ताळलेल्या जखमांचा खेळ नवा !

रक्ताळलेल्या जखमांचा खेळ नवा !

Next

- सचिन जवळकोटे

पंढरीचं इलेक्शन केवळ पंढरपूर व्हर्सेस मंगळवेढा नव्हे. भगीरथ विरुद्ध समाधान नव्हे. असेल ‘बारामतीकर’ अन्‌ ‘नागपूरकर’ यांच्यातील बुद्धिभेदाचा विषारी संघर्ष. असेल ‘अकलूजकर’ अन्‌ ‘निमगावकर’ यांच्यातली सूडनाड्याची विखारी झुंज. असेल एकमेकांच्या जुन्या पराभवाचे वचपे काढणाऱ्या खंजिरांचा खणखणाट. मात्र यात किती जणांच्या पाठी आता रक्ताळणार, हे हबकलेल्या भीमथडीलाच माहीत.


खंजिरांचा खणखणाट...

येत्या बुधवारपासून चंद्रभागेच्या तीरी गर्जू लागेल आरोपांचं भजन. प्रत्यारोपांचं कीर्तन. राजकीय हेवेदाव्याचे टाळ-मृदंग घेऊन सहभागी होतील यात राज्यातली दिग्गज नेतेमंडळी. त्यातल्या त्यात जिल्ह्याच्या प्रमुख नेत्याचांही आलाप पूर्णपणे टीपेला पोहोचलेला. विशेष म्हणजे प्रत्येकाचा हेतू वेगळा. ‘रणजितदादां’ना २००९ च्या विधानसभा पराभवाचा सूड घ्यायचाय, तर ‘संजयमामां’ना २०१९ च्या लोकसभेचं उट्टं काढायचंय. ‘कल्याणरावांना’ही आता कुठंतरी एका जागी सेटल व्हायचंय. नाहीतरी आयुष्यभर इकडून तिकडं अन्‌ तिकडून इकडं हेलपाटे मारून त्यांच्या गाडीची टायरंबी फाटल्याती.
असो. इतर नेत्यांप्रमाणेच इथल्या दोन प्रमुख उमेदवारांनाही यापूर्वी पराभव पोळलेला. ‘समाधानदादा’ विधानसभेला, तर ‘भगीरथदादा’ झेडपीला रिकामं भांडं वाजवत घरी परतलेले. ‘वाड्यावरचे पंत’ही गेल्या दोन निवडणुकीत तावून सुलाखून निघालेले. त्यामुळं परा‘भुताचा फेरा’ हटविण्यासाठी साऱ्यांनाच लागलेत विजयाचे वेध. अर्ज मागं घेण्यापूर्वीच्या या तीन घटना. पडद्यामागं घडलेल्या; मात्र ‘लगाव बत्ती’च्या वाचकांना हक्कानं समजणाऱ्या. 


पहिला किस्सा ‘नागेश’रावांचा. त्यांच्या उमेदवारीमुळं उलट ‘भगीरथदादां’ची मतं फुटतील, असा ‘प्रशांत पंतां’चा होरा. मात्र ‘देवेंद्र नागपूरकरां’चे पीए थेट पंढरीत दाखल झालेले. आपल्याच नगराध्यक्षांचे मिस्टर बंडखोरी करतात, असा चुकीचा मेसेज मतदारांपर्यंत जाईल, तेव्हा काहीही करून मागं घ्या, असा सांगावा मिळताच ‘नागेश’राव गपगुमानं हात-पाय धुऊन घरी टीव्ही बघत बसले. लगाव बत्ती..


दुसरा किस्सा ‘शैलाताईं’च्या मिस्टरांचा. खूप वेळा प्रयत्न करूनही ‘नार्वेकरां’चा फोन उचलला नाही म्हणून ‘भाळवणी’हून ‘संभाजी’ थेट ‘गोडसे’च्या घरी पोहोचले. त्यांच्या मोबाईलवरून अर्ज माघारीचा निरोप दिला; मात्र ‘बघूऽऽ करूऽऽ’ अशी भाषा ‘ताईं’कडून ऐकायला मिळाली. मिस्टर ‘धनुभावजी’ हे तर ‘जलसंपदा’मध्ये कामाला. त्यामुळं या खात्याचे मंत्री असलेल्या ‘जयंतरावां’नी त्यांच्याशी संपर्क साधला. मात्र त्यांचा कॉल येताच ‘भावजीं’नी मोबाईलच बंद करून ठेवला. मग काय..  ‘जयंतराव’ संतापले. इगो दुखावला गेला. थेट ‘मातोश्री’सोबत चर्चा. लगेच दुसऱ्या दिवशी ‘ताईं’च्या हकालपट्टीची घोषणा. खरंतर कुठल्यातरी महामंडळाचा शब्द मिळाला, तर मागं सरकण्याची तयारीही ठेवलेली. आता कसलं कायऽऽ तेल गेलं.. तूप गेलं.. आंदोलनात वाळवंटकाठी भाकरी भाजलेली भगवी चूलही गेली.. लगाव बत्ती..


तिसरा किस्सा मंगळवेढ्याचा. ध्यानीमनी नसताना ‘आवताडें’ची ‘भाऊबंदकी’ अकस्मात उफाळून आली. साखर कारखान्यातल्या अधिकारावरून सुरू झालेली धुसफूस थेट आमदारकीच्या मैदानात हमरीतुमरीवर आली. ‘अकलूजकर’ पिता-पुत्रही ‘बबनरावां’ना दिवसभर समजावून थकले. अकलूजमध्ये म्हणे कुणीतरी पुटपुटलं, ‘एवढे प्रयत्न धवलदादांसोबत केले असते तर स्वत:च्या घरातला वाद तरी कायमचा मिटला असता.’


असो. ‘देवेंद्र नागपूरकरां’नीही थेट कॉल करून ‘सिद्धेश्वर’ ऊर्फ ‘अध्यक्ष’ यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ‘तुमचं कुठंतरी वरच्या लेव्हलला पुनर्वसन करू’ असा शब्दही दिला; ‘पण स्थानिक पातळीवरच्या सर्व संस्था सांभाळून इथंच आम्हाला चांगली भरपाई देण्याचं ठरलंय’ हे थोडंच ‘अध्यक्ष’ सांगताहेत. आता त्यांचं ‘कुणासोबत ठरलंय’ याचं उत्तर शोधण्यासाठी म्हणे काही कार्यकर्ते ‘अजितदादां’ना जाऊन भेटणार आहेत. खरंच..ग्रेट हं.. ‘भाऊबंदकी’चा विस्तू भडकवून अख्खं घराणंच उद्‌ध्वस्त करण्याची परंपरा आता मंगळवेढ्यापर्यंत पोहोचली, हेच खरं. लगाव बत्ती..

सोलापुरी ‘उड्डाण’..

कालचाच किस्सा. पुण्यात लॉकडाऊनच्या हालचाली सुरू होताच ‘एक पुणेरी सोलापूरकर फॅमिली’ कारमधून थेट सोलापुरात पोहोचली. एसटी स्टँडसमोर ट्रॅफिक जाम. वाहनांच्या रांगा लागलेल्या, कारण समोरून म्हशींचा कळप निवांतपणे रवंथ करत निघालेला. हॉर्न वाजवून-वाजवून चिडलेल्या पित्याकडं बघत कारमधल्या छोकऱ्यानं आश्चर्यानं विचारलं, ‘व्हाय नॉट फ्लाय ओव्हर...तुमच्या ओल्ड गावात पप्पा ?’ वडिलांच्या चेहऱ्यावर ओशाळवाणा खजिलपणा. स्मार्ट मम्मीच्या गालावर मात्र कुजकं स्माईल ‘हंऽऽ उड्डाण हा शब्द तर माहिताय का विचार, कधी तुझ्या पप्पांच्या गाववाल्यांना ?’
आता ‘उड्डाण’ हा शब्द तिला ‘पुला’संदर्भात अभिप्रेत होता की ‘विमाना’बाबत तिलाच माहीत. मात्र शेजारचं कोल्हापूर गाव ‘नाईट लँडींग’साठीही आक्रमक होत असताना सोलापूरकर मात्र अजूनही एखादं विमान    आकाशातून गेलं तर लगेच घरातून पळत बाहेर येतात. मोठ्या अपूर्वाईनं आकाशाकडं बोट करत ‘विमाऽऽनऽऽ’ म्हणून ओरडतात.
‘उड्डाणपुला’चीही हीच अवस्था. बाजूच्या ‘लातूर’नं दशकापूर्वीच उड्डाणपूल उभारून गावाचं रूप पालटून टाकलं. आम्ही मात्र काम मंजूर होऊनही केवळ मूठभर लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी पुलाचा विषय गाडून टाकतोय. आम्हाला शहराच्या विकासापेक्षाही मतांचा बाजार महत्त्वाचा वाटतो. धनदांडग्यांच्या जागा जिव्हाळ्याच्या वाटतात.. लगाव बत्ती..

का म्हणुनी बदनाम MH-१३..

गेल्या आठवड्यातली घटना. सोलापूरचं एक कुटुंब ‘तिरुपती’ला बायरोड गेलेलं. आंध्रात त्यांची गाडी अडविली गेली. सर्व कागदपत्रं व्यवस्थित असूनही दंड ठोठावला गेला. सात ते आठ तास एकाच जागी थांबवून ठेवलं गेलं. रडकुंडीला आलेल्या ड्रायव्हरनं शेवटी पोलिसांचे पाय धरले, तेव्हा उलगडा झाला, केवळ ‘MH-13’ पासिंग बघून हा सूड घेतला गेला म्हणे. ‘आमच्या गाड्या तुमच्या सोलापुरात ठरवून अडविल्या जातात. पद्धतशीर लूटमार केली जाते. आम्ही असंच केलं तर तुमच्या लक्षात येईल, किती त्रास होत असतो प्रवाशांना..’ त्या पोलिसाची भूमिका स्पष्ट होताच गाडीतल्या साऱ्यांच्याच माना लाजेनं खाली झाल्या. शिर्डी, तुळजापूर, पंढरपूर, गाणगापूर अन्‌ अक्कलकोट दर्शनाला येणाऱ्या परराज्यातील प्रवाशांची सोलापुरात होणारी अडवणूक आपल्या गावासाठी किती बदनामीची ठरू लागलीय हे साऱ्यांच्याच लक्षात आलं; पण इथं कुणाला स्वत:च्या गावाबद्दल पडलंय ? ‘हायवे’वर दिवसभराचं टारगेट पूर्ण केलं म्हणजे संध्याकाळी ‘बुलेटची किक’ मारायला आपण मोकळे. लगाव बत्ती..

(लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: The game of bloody wounds is new!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.