निवडणूक विशेष लेख: राहुल गांधी, शरद पवारांच्या दौऱ्याचा मविआला लाभ कितपत?

By मिलिंद कुलकर्णी | Published: March 18, 2024 09:35 AM2024-03-18T09:35:40+5:302024-03-18T09:36:19+5:30

लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून आता तयारीला अधिकच जोर आला आहे

Election Special Article: Rahul Gandhi, Sharad Pawar's visit will benefit Maviya to what extent? | निवडणूक विशेष लेख: राहुल गांधी, शरद पवारांच्या दौऱ्याचा मविआला लाभ कितपत?

निवडणूक विशेष लेख: राहुल गांधी, शरद पवारांच्या दौऱ्याचा मविआला लाभ कितपत?

बेरीज-वजाबाकी: मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी संपादक, लोकमत

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचे उत्कृष्ट नियोजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सहभाग, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट, शिवसेना ठाकरे गट, माकप, समविचारी संघटना यांच्या संयुक्त प्रयत्नाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मितीत आघाडी यशस्वी ठरली आहे. दोन महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकसाठी दिलेला अर्धा दिवस जसा प्रभाव निर्माण करून गेला, त्याप्रमाणे राहुल गांधी यांच्या यात्रेने प्रभाव निर्माण केला. मालेगावात जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, शहराध्यक्ष एजाज बेग, चांदवड येथे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, पिंपळगाव बसवंत येथे माजी आमदार अनिल कदम, नाशकात डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, डाॅ. हेमलता पाटील, शहराध्यक्ष आकाश छाजेड, त्र्यंबकेश्वर येथे आमदार हिरामण खोसकर येथे यांनी पूर्ण ताकद लावली. यात्रा झाली; मात्र, याचा लाभ कॉंग्रेसला होईल काय?

राहुल गांधींची शेतीप्रश्नांवर थेट भूमिका

केंद्र सरकार व भाजप यांच्यावर शेतीप्रश्नांविषयी उदासीन राहिल्याचा आरोप विरोधक नेहमी करीत असतात. कृषीविषयक तीन कायदे, दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन, नाशिक जिल्ह्यातील कांदा व द्राक्ष उत्पादकांची सुरू असलेली ससेहोलपट यामुळे शेतकऱ्यांच्या असलेल्या नाराजीला विरोधी पक्षांनी हवा देणे अपेक्षित होते. राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान चांदवडच्या सभेत शेतीप्रश्नांविषयी घेतलेली थेट भूमिका शेतकऱ्यांना भावली. त्यांनी सुचविलेले पाच उपाय शेतकऱ्यांच्या दृष्टीने आशेचा किरण ठरू शकतात, अशी वातावरणनिर्मिती करण्यात त्यांना यश आले. मोठ्या उद्योगपतींप्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार किमान आधारभूत किंमत देऊ, पीकविम्याची पुनर्रचना करणार, कांद्यासह सर्वच शेतीमालाचे आयात-निर्यात धोरण शेतकरीस्नेही करणार, शेतकऱ्यांना जीएसटीतून मुक्त करणार, या घोषणा प्रभावी ठरल्या. यात्रेनंतर मतदानापर्यंत हे वातावरण टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला प्रयत्न करावे लागणार आहेत.

मविआच्या उमेदवारांविषयी शरद पवार सतर्क

शरद पवार आणि नाशिक जिल्हा हे समीकरण आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सहकार, सांस्कृतिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील घडामोडींविषयी पवार हे सजग आणि सतर्क असतात, हे वेळोवेळी दिसून आले. मविप्रच्या निवडणुकीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. यशवंतराव चव्हाण केंद्र, कुसुमाग्रज प्रतिष्ठान या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्राला बळ देण्याचे कार्य केले. कादवा कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभासाठी वर्षभरापूर्वी ते येऊन गेले. त्यामुळे नाशिकमध्ये पवार यांची म्हणून काही माणसे आहेत. त्यांच्याकडून नाशिकचा कानोसा ते नेहमी घेत असतात. अशी इत्थंभूत माहिती असलेला राज्यस्तरीय नेता दुसरा नाही. राष्ट्रवादीतील बंडानंतर त्यांची पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवल्यात झाली. आता निफाडला आमदार दिलीप बनकर यांच्या मतदारसंघात सभा घेऊन उर्वरित तिघांना इशारा दिला आहे. दिंडोरीत त्यांनी भास्कर भगरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. नाशिकमध्येदेखील ते सेनेच्या उमेदवाराविषयी सल्लागाराच्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे.

विजय करंजकरांवर पुन्हा अन्याय?

नाशिक मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मनसेच्या निर्मितीनंतरही सेनेने हा बालेकिल्ला अबाधित राखला. उमेदवारी बदलत राहिल्याने सेनेला यश मिळत गेले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही मोठी निवडणूक होत आहे. नाशिकच्या बालेकिल्ल्यावर सेनेने जोर दिलेला आहे. राज्यस्तरीय मेळावा नाशकात घेऊन पक्षाने इरादे जाहीर केले. अद्वय हिरे, सुधाकर बडगुजर या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध सरकारने कारवाई केल्यानंतरही पक्ष सक्षमपणे उभा आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत हे नाशिकच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. विधान परिषद निवडणुकीत विजय करंजकर यांचे नाव यादीत असूनही ती निवडणूक होऊ न शकल्याने ते आमदारकीपासून वंचित राहिले. आता खासदारकीसाठी त्यांचेच नाव पक्षाने निश्चित केले आहे. मात्र शरद पवार-संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर करंजकर यांचे नाव मागे पडत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पक्षाबाहेरील उमेदवार शिवसैनिक स्वीकारतील काय? करंजकरांवर पुन्हा अन्याय होईल काय हे लवकरच स्पष्ट होईल.

डॉ. भारती पवार यांच्यावर पुन्हा विश्वास

केंद्रीय आरोग्य व जनजाती कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उमेदवारीविषयी पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर देखील नकारात्मक वातावरण तयार करण्याचा झालेला प्रयत्न भाजपने पुन्हा उमेदवारी देऊन उधळून लावला आहे. उच्चविद्याविभूषित, आरोग्य आणि जनजाती कल्याण या दोन्ही खात्यांचा अभ्यास आणि देशभरातील त्यासंबंधीच्या दौऱ्यामुळे डॉ. पवार यांनी सरकार आणि पक्षात स्वत:ची प्रतिमा निर्माण केली आहे. स्थानिक पातळीवर जनसंपर्क, पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन विकासकामांची आखणी व अंमलबजावणी यासंबंधी नाराजी आहे. निरीक्षक राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर अनेक पदाधिकाऱ्यांनी ती उघडपणे मांडल्याचे सांगितले जाते. कांदा व द्राक्ष उत्पादकांची नाराजी हा महत्त्वाचा मुद्दा त्यांच्याविरोधात आहे. या सगळ्याचा परिपाक म्हणजे डॉ. पवार यांना उमेदवारी मिळणार नाही, असे चित्र निर्माण केले गेले. मात्र पक्षाने निष्ठा व संयमाला महत्व दिले.

शिवसेनेची रणनीती की अतिआत्मविश्वास

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय पक्ष आक्रमकपणे मैदानात उतरले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी असली तरी प्रत्येक पक्ष स्वतंत्रपणे निर्णय घेताना दिसत आहे. अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार बारामतीतून सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी बहाल केली. भाजपवगळता कोणत्याही पक्षाची अधिकृत यादी अद्याप जाहीर झालेली नसली तरी अनेकांची घोषणा परस्पर झाली आहे. नाशिकमध्ये आमदारांचा विचार केला तर भाजप : ३, अजित पवार गट : २ असे संख्याबळ महायुतीकडे आहे. शिंदे यांच्या गटाकडे ही जागा असली तरी राजकीय स्थिती विचारात घेता समन्वय व संवादाने उमेदवारी जाहीर व्हायला हवी होती. महायुतीतील दबावाचे राजकारण म्हणून ही उमेदवारी जाहीर केली की, अतिआत्मविश्वास होता, हे कळायला मार्ग नाही.

Web Title: Election Special Article: Rahul Gandhi, Sharad Pawar's visit will benefit Maviya to what extent?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.