लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?

By अतुल कुलकर्णी | Updated: June 23, 2025 06:37 IST2025-06-23T06:32:29+5:302025-06-23T06:37:03+5:30

BMC Election Politics: भाजपचा अजित पवार यांच्या विषयीचा सॉफ्ट कॉर्नर गेल्या काही महिन्यांत स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यामुळे मुस्लीम बहुल मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. 

Article: Who will get fewer seats? BJP or Shinde's Shiv Sena? | लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?

लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?

- अतुल कुलकर्णी (संपादक, मुंबई)
दोन शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत झाले. दोघांनीही महापालिका निवडणूक जिंकण्याचा इरादा स्पष्ट केला आहे. शिंदे गटाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महानगरपालिकेची प्रतिकृतीच भेट दिली. दोघांकडेही तुडुंब गर्दी होती. 

सभेत ठाकरेंनी एखादा सवाल केला की, समोरून येणारा प्रतिसाद उत्स्फूर्त होता, असे भाजपचेच नेते खासगीत सांगतात. अर्थात, ते शिंदेंच्या असूयेपोटी की वस्तुस्थितीला धरून, याचे उत्तर लगेच मिळणार नाही. आत्ता कुठे एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणे सुरू झाले आहे. 

प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात व्हायची आहे. कम ऑन किल मी... असे सांगून झाले आहे. ॲम्बुलन्स वापरण्याचीही भाषा झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत खरी लढाई दोन शिवसेनेत होणार की, दोन शिवसेनाविरुद्ध भाजपमध्ये होणार? यावर आता सट्टा खेळणाऱ्यांना उत्साह आला नसेल तर नवल. 

२०१७ मध्ये शिवसेनेचे ८४ नगरसेवक होते. त्यापैकी ५० आणि इतर पक्षांतले १५ माजी नगरसेवक आपल्याकडे आल्याचे शिंदे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. याचा अर्थ, मुंबई महापालिकेच्या २२७ पैकी ६५ जागा शिंदे यांना लागतीलच, शिवाय वेगळी शिवसेना केल्यापासून लोकसभा, विधानसभेला मदत करणाऱ्या प्रत्येकाने महापालिकेची उमेदवारी मिळेल म्हणून कष्ट केले आहेत. अशांची संख्याही मोठी आहे. 

एवढ्या सगळ्यांना उमेदवारी द्यायची, तर शिंदे गटाला किमान १०० ते १२० जागा लागतील. मुंबई पालिकेच्या २२७ पैकी एवढ्या जागा शिंदे गटाने मागितल्या, तर भाजपकडे लढण्यासाठी किती जागा उरणार? २०१७ ला निवडून आलेले ६५ माजी नगरसेवक जरी आज शिंदे गटात असले, तरी ते जेव्हा निवडून आले तेव्हाची आणि आजची राजकीय परिस्थिती यात प्रचंड फरक पडला आहे. त्यावेळची लोकसंख्या आणि डायनामिक्स आता पूर्णपणे बदलून गेले आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून उद्धव-राज-शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला तर मराठी मतांचे विभाजन होईल, शिवाय भाजप आणि अजित पवार गटाची स्वतःची अशी मराठी मते आहेतच. त्यामुळे मराठी मतांचे विभाजन अटळ आहे. त्याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसू शकतो. त्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, असे म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना साद दिली आहे. 

राज यांनी भाजपसोबत जाण्याचे ठरविले तर त्याचा मोठा फायदा भाजपला आणि काही प्रमाणात राज ठाकरे यांना होऊ शकतो तर उद्धव - शिंदे या दोघांना त्याचा फटका बसू शकतो. राज ठाकरे यांनी अजूनही आपले पत्ते ओपन केले नाहीत. शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा भाजपला फायदा होईल की तोटा याचा अभ्यास भाजपने करून ठेवला आहे. शिंदे - उद्धव-राज यांच्यात होणारी लढाई भाजपच्या फायद्याची असेल. 

उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून मुंबईत स्थायिक झालेला मतदार उद्धव व  राज यांच्या बाजूने जाण्याचा प्रश्नच येत नाही. गुजराती मतदारदेखील मोठ्या प्रमाणावर भाजपसोबत जातो हा आजवरचा इतिहास आहे. मुंबईत ज्याप्रमाणे मराठी मतांचे विभाजन होईल. त्याचप्रमाणे मुस्लीम मतांचे विभाजन अटळ आहे. 

समाजवादी, काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे अशा चौघांमध्ये मुस्लीम मतदान विभागले जाईल. ते मतदान राज ठाकरे यांना मिळण्याची सुतराम शक्यता नाही. शिवाय काही प्रमाणात हे मतदान भाजपलाही मिळू शकते. 

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये मुस्लीम मतांचे विभाजन होण्याची शक्यता पाहिली तर ती अजित पवारांच्या बाजूने जास्त जाऊ शकते. भाजपचा अजित पवार यांच्या विषयीचा सॉफ्ट कॉर्नर गेल्या काही महिन्यांत स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यामुळे मुस्लीम बहुल मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. 

एकनाथ शिंदे यांचे जेवढे जास्त नगरसेवक निवडून येतील तेवढा ते भाजपवर दबाव निर्माण करू शकतात, हे भाजपला माहिती आहे. त्या उलट अजित पवार यांचे कितीही नगरसेवक निवडून आले, तरी ते भाजप सांगेल त्या दिशेला जायला तयार असतील. 

या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपला मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणत स्वतःचा महापौर बसवायचा आहे. या निवडणुकीत मुंबई पालिकेत महापौर आणि स्टॅंडिंग कमिटी चेअरमन भाजपचाच असेल असे भाजपचे नेते खासगीत सांगत आहेत. 

ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर काही प्रश्न निर्माण होतात. शिंदे यांना मोजक्या जागा देऊन नियंत्रणात ठेवायचे का? शिंदे यांनी पडती भूमिका घेत मिळेल त्या जागांवर समाधान मानायचे का? शिंदे यांना समाधान वाटेल एवढ्या जागा देऊन भाजपने युती धर्माचे पालन करायचे का? या तीन प्रश्नांच्या व्यतिरिक्त चौथा प्रश्न आज तरी समोर दिसत नाही. 

अर्थात, राज आणि उद्धव या दोघांनी एकत्र येण्याचे ठरवले. दोघांनी मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे या मोठ्या महानगरपालिकामधील जागांचे समाधानकारक वाटप करून घेतले तर मात्र महापालिका निवडणुकांचे गणित बदलू शकते. याची शक्यता आज तरी धूसर आहे. मात्र, अशक्य ते शक्य करून दाखविण्याचा खेळ म्हणजेच राजकारण हेच खरे..! 

Web Title: Article: Who will get fewer seats? BJP or Shinde's Shiv Sena?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.