भारताने आशिया कप जिंकताच शोएब अख्तर म्हणाला- "तुम्ही आम्हाला फसवलंत, दगा दिलात..."

शोएब अख्तरच्या या आरोपाचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या सविस्तर

Shoaib Akhtar on Asia Cup Final, IND vs SL : भारतीय संघाने आशिया चषक फायनलमध्ये श्रीलंकेवर विजय मिळवला. या विजयानंतर चहुबाजूंनी भारतावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने मात्र वेगळेच विधान केले.

भारतीय संघाने श्रीलंकेच्या म्हणण्यानुसार प्रथम गोलंदाजी केली. श्रीलंकेला टॉस जिंकणं महागात पडलं आणि त्यांचा संपूर्ण संघ ५० धावांवर तंबूत परतला. सिराजने ६ विकेट्स घेतल्या. तर प्रत्युत्तरात भारताच्या सलामीवीरांनी ६ षटकांत सामना जिंकला.

भारतीय संघाने सर्वाधिक ८ वेळा आशिया चषकावर आपले नाव कोरले. या विजयानंतर एका चॅनेलला मुलाखत देताना, 'भारताने आम्हाला फसवलं, धोका दिला', असा विचित्र आरोप शोएब अख्तरने केला. तो असं का म्हणाला ते जाणून घ्या.

आशिया चषकाची सुरूवात होण्याआधी शोएब अख्तर म्हणाला होता की, भारत सहजासहजी ही स्पर्धा जिंकू शकत नाही. त्यावरून अख्तरला प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा अख्तर म्हणाला की, तुम्ही आम्हाला फसवलंत, आम्हाला दगा दिलात.

या साऱ्या गप्पा अतिशय मजेशीर पद्धतीने सुरू होत्या. अख्तर म्हणाला, "भारताने फायनलमध्ये सगळ्यांना 'मामू' बनवलं. तुम्ही आमची फसवणूक केलीत. सुरूवातीला तुम्ही वेगळं काहीतरी दाखवलंत आणि आज काहीतरी वेगळंच खेळलात. आम्हाला तुम्ही धोका दिलात. तुमचा संघ ठीक नाहीये असं तुम्ही म्हणत होतात, पण तो सगळा तुमचा कट होता."

हसत-हसत अख्तर पुढे म्हणाला- "मस्करी बाजूला ठेवून खरं खरं सांगतो की भारताला या विजयाने खूप विश्वास वाटला असेल. हा विजय केवळ पाकिस्तानसाठीच नव्हे तर सर्वच संघांना धडकी भरवणारा आहे. कारण स्वत:च्या भूमीत, अशा संघासोबत, अशा आत्मविश्वासासह भारतीय संघ नक्कीच खूप घातक ठरेल यात वादच नाही."