ट्वेन्टी-२० वर्ल्डकप सामन्यांमध्ये यंदा सामना सुरू होण्याआधीच कळतंय की कोण जिंकणार?; भारताचं काय होणार?

T20 World Cup 2021: ट्वेन्टी-२० वर्ल्डकपसाठीची झुंज यूएईमध्ये सुरू आहे. सध्या सुपर-१२ संघांचे सामने सुरू आहेत. यात रंगतदार सामने अनुभवायला मिळत आहेत. पण या सर्वांमध्ये एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामन्याचा निकाल आधीच कळू लागलाय? नेमकं कसं ते जाणून घेऊयात....

ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचं यजमानपद भारताकडे असलं तरी कोरोना परिस्थितीमुळे सामने यूएई आणि ओमानमध्ये खेळविण्यात येत आहेत. अर्थात बीसीसीआयच्या अधिपत्याखालीच याचं आयोजन करण्यात आलं आहे. ट्वेन्टी-२० वर्ल्डकपचे सुपर-१२ चे साखळी सामने सध्या सुरू आहेत आणि प्रत्येक संघ वर्ल्डकप विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

पण या सर्वांमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं समोर येत आहे. सामन्यात कोणता संघ जिंकणार हे जवळपास काही सेंकदात ठरत आहे.

यामागे कोणतंही रॉकेट सायन्स नसून सामन्याचा नाणेफेकीचा कौल अत्यंत महत्त्वाचा ठरताना दिसून येत आहे. आतापर्यंत नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारलेला संघच सामना जिंकल्याचं दिसून आलं आहे.

सुपर १२ मधील लढतीत आतापर्यंतच्या एकूण १० सामन्यांपैकी ९ सामने नाणेफेक जिंकणारा संघच सामना जिंकला आहे. यात बांगलादेश केवळ याला अपवाद आहे. बांगलादेशनं स्पर्धेत नाणेफेक जिंकूनही इंग्लंड विरुद्धचा सामना गमावला. पण नाणेफेक जिंकून बांगलादेशनं या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. सर्व सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी घेतल्यानं संघाला विजय प्राप्त झाल्याचं दिसून आलं आहे.

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकली आणि द.आफ्रिकेविरुद्ध ५ विकेट्सनं विजय प्राप्त केला. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून ६ विकेट्सनं सामना जिंकल्या. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून ५ विकेट्सनं सामना जिंकला. पाकिस्ताननं नाणेफेक जिंकली आणि भारताविरुद्धचा सामना जिंकला.

अफगाणिस्ताननंही नाणेफेक जिंकली आणि तब्बल १३० धावांनी विजय साजरा केला. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून ८ विकेट्सनं सामना जिंकला. पाकिस्ताननं पुन्हा एकदा नाणेफेक जिंकली आणि न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला. नामिबियानं नाणेफेक जिंकली आणि स्कॉटलंडवर विजय साजरा केला.

यूएईमधील खेळपट्टीचा विचार करता नाणेफेक जिंकून प्रत्येक कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेताना दिसत आहे आणि तो योग्य ठरत असल्याचंही सिद्ध झालं आहे. त्यामुळे नाणेफेकीचा कौल या स्पर्धेत अत्यंत महत्त्वाचा ठरू लागला आहे.

अर्थात हा आकडेवारीचा योगायोग असला तरी नाणेफेकीचं महत्त्व नाकारता येणार नाही. नाणेफेकीच्या निर्णयावरुच संघ पुढील रणनिती ठरवत असतात.

आजच्या सामन्यातही ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कांगारुंनी श्रीलंकेवर विकेट्सनं विजय प्राप्त केला आहे. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. दुसऱ्या इनिंगमध्ये स्टेडियममध्ये दव पडल्यानं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फायदा झाल्याचं दिसून आलं. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत विजय प्राप्त केला.

एकंदर आतापर्यंतच्या सामन्यांच्या निकाल पाहता नाणेफेकीला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळेच ३१ ऑक्टोबर रोजी भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सामना रंगणार असून नाणेफेकीचा कौल कुणाच्या बाजूनं लागतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.