वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीनही टी२० सामन्यांमध्ये इशान किशनला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये किशनने ८९ धावांची दमदार खेळी करून दाखवली.
श्रीलंकेविरुद्ध इशान किशनने कर्णधार रोहित शर्मासोबत १११ धावांची भागीदारी केली. रोहित ४४ धावांवरच बाद झाला. त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं.
रोहित शर्मा आणि इशान किशनशिवाय श्रेयस अय्यरनेही तुफान फटकेबाजी केली. त्याने २८ चेंडूत नाबाद ५७ धावा कुटल्या.
पण इशानची ८९ धावांची खेळी ही सर्वोच्च ठरली. या दमदार खेळीसह इशान हा टी२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या करणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला.
इशान किशनने दणकेबाज खेळी करूनदेखील भारताचे महान फलंदाज सुनील गावसकर हे त्याच्या खेळीबद्दल पूर्णपणे समाधानी नसल्याचे दिसून आले.
गावसकर म्हणाले की, इशान किशनला टी२० क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखणं हे खूप मोठं आव्हान असणार आहे. त्याला सलग चांगली कामगिरी करावी लागेल, तरच त्याला टी२० क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळू शकेल.
'इशान किशनने शानदार फलंदाजी केली, पण पहिलाच सामना होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिन्ही टी२० मध्ये तो फलंदाजी करताना नीट खेळत नव्हता. बाऊन्सर चेंडू खेळताना त्याला त्रास होत होता', असं निरीक्षण गावसकरांनी नोंदवलं.
'त्याचे प्रयत्न आणि त्याची खेळी नक्कीच दमदार होती यात वाद नाही. त्याने काही ड्राईव्ह आणि पुल शॉट्स खेळले. ते खरोखरच उत्कृष्ट होते. पण अशी खेळी त्याने सध्या फक्त एकच सामन्यात केली आहे', असं गावसकरांनी नमूद केलं.
'आता आपण थोडी वाट पाहिली पाहिजे. इशान किशनने अशा चांगल्या खेळी खेळणं सुरू ठेवायला हवं आणि त्यासाठी आपण थोडी प्रतीक्षा केली पाहिजे. अजून दोन सामने बाकी आहेत. त्यानंतर आपण बोलूया', असं सूचक विधान गावसकरांनी केलं.