T20 World Cup: २००७ पासून आतापर्यंत भारतीय संघाची टी-२० वर्ल्डकप जर्सी कशी होती, पाहा फोटो

१६ ऑक्टोंबरपासून टी-२० २०२२ च्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघाचा आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध २३ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. या आधी भारताला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांविरूद्ध सराव सामने खेळायचे आहे. २००७ च्या टी-२० विश्वचषकापासून भारतीय संघाच्या जर्सीत अनेक बदल पाहायला मिळाले आहेत.

भारतीय संघाने नव्या जर्सीत २००७ मध्ये पहिला टी-२० विश्वचषक खेळला होता. भारतीय संघाच्या एकदिवसीय जर्सीत फारसा बदल झालेला नव्हता आणि त्याच जर्सीत धोनी आणि ॲंड कंपनी टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेली आणि चॅम्पियन बनून परतली होती. यंदा होणाऱ्या टी-२० विश्वचषकात देखील भारतीय संघ नव्या जर्सीत झळकणार आहे.

२००९ मध्ये भारतीय संघाची विश्वचषक जर्सी खूप बदलली होती. नेव्ही ब्लू जर्सीमध्ये विश्वचषक खेळण्यासाठी गेलेला भारतीय संघ विशेष काही कामगिरी करू शकला नव्हता. दोन्ही आशियाई संघांनी अंतिम फेरीत धडक मारली आणि पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. मात्र भारतीय संघाला निराशाजनक कामगिरीमुळे स्पर्धेत आपली छाप सोडता आली नव्हती.

२०११ मध्ये आयोजित होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकामुळे २०१० मध्ये लगेचच टी-२० विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. याही विश्वचषकात भारतीय संघ काही चमत्कार करू शकला नाही. संघाच्या जर्सीत थोडा बदल झाला पण कामगिरी तशीच राहिली होती. या विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इंग्लिश संघाने विजेतेपद पटकावले होते.

२०१२ मध्ये पहिल्यांदाच क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपाची अर्थात टी-२० प्रकाराची स्पर्धा आशियामध्ये आयोजन करण्यात आली होती. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेने भूषवले होते. १२ संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाची जर्सी जुन्या शैलीत बनवली गेली होती परंतु रंग गडद निळा राहिला. या स्पर्धेत देखील भारताने काही उल्लेखणीय कामगिरी केली नव्हती आणि वेस्ट इंडिजने यजमान श्रीलंकेला हरवून किताब पटकावला होता.

२०१४ चा विश्वचषक देखील आशियामध्ये झाला आणि यावेळी बांगलादेशला यजमानपद मिळाले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करून अंतिम फेरीत धडक मारली. मात्र संघ विजेतेपदापासून वंचित राहिला आणि श्रीलंकेने पहिल्यांदाच टी-२० चा किताब जिंकला.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने २०१६ च्या विश्वचषकात शानदार सुरूवात केली होती. यावेळी संघाची जर्सी एकदिवसीय जर्सीपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती. या स्पर्धेत संघ वेगळ्याच लयमध्ये दिसला आणि शानदार पद्धतीने उपांत्यफेरीत धडक मारली. परंतु उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताला वेस्ट इंडिजविरूद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.

२०१८ आणि २०२० च्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले होते. ऑस्ट्रेलियातील खराब परिस्थिती पाहता यूएईने २०२१ मध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन केले होते. यावेळी भारतीय संघाची जर्सी मोठ्या प्रमाणात बदलण्यात आली होती पण संघाला पहिल्याच फेरीतून बाहेर व्हावे लागले होते.