'४८ तास आधीच माहीत होतं की बाकावर बसावं लागणार; संघात आता मित्र नाही राहिलेत'

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये टीम इंडियाने आर अश्विनला ( R Ashwin) का नाही खेळवलं, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात सर्व व्यग्र आहेत. जगातील नंबर वन कसोटी गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आर अश्विन टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्याचा सर्वांनाच धक्का बसला होता.

ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लाएनने दुसरीकडे ४ विकेट्स घेत भारताचा दुसरा डाव २३४ धावांत गुंडाळून संघाला २०९ धावांनी विजय मिळवून देण्यात हातभार लावला. अशात आर अश्विन प्लेइंग इलेव्हनमध्ये असायला हवा होता, असे सर्वांना वाटणे साहजिकच आहे. पण, अश्विनला सामन्याच्या ४८ तास आधीच माहित होतं की त्याला खेळवणार नाही.

रविचंद्रन अश्विनने WTC Final मध्ये खेळण्याची संधी न मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे . ''अंतिम फेरीत खेळायला आवडले असते कारण, संघाला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मीही योगदान दिलेच होते. पण, फायनल खेळू न शकणे ही निराशा मानत नाही. पण, मी जेव्हा निवृत्ती घेईन तेव्हा पश्चाताप होईल की मी फलंदाजाऐवजी गोलंदाज बनलो,''असे अश्विन म्हणाला.

त्याने इंडियन एक्स्प्रेसशी संवाद साधताना म्हटले की,''हा खूप कठीण प्रश्न आहे. कारण आम्ही WTC फायनल झाल्यानंतर बोलत आहोत. मला खेळायला आवडले असते कारण संघ तिथे पोहोचण्यात माझीही भूमिका होती. गेल्या फायनलमध्ये मी चार विकेट घेतल्या आणि चांगली गोलंदाजी केली. २०१८-१९ पासून परदेशात माझी गोलंदाजी उत्कृष्ट झाली आहे. कर्णधार किंवा प्रशिक्षक म्हणून मी हा निर्णय पाहतो.''

''गेल्या वेळी आम्ही इंग्लंडमध्ये खेळलो तेव्हा कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली होती. त्यानंतर संघात चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज ठेवण्यात आला. अंतिम सामना खेळताना प्रशिक्षक व कर्णधाराने हाच विचार केला असेल. फिरकीपटूसाठी अडचण अशी आहे की चौथ्या डावात त्याची कामगिरी खूप महत्त्वाची ठरते. पण, फिरकीपटूची भूमिका उपयुक्त ठरण्यासाठी भरपूर धावा कराव्या लागतात. तो पूर्णपणे मानसिकतेचा विषय आहे. माझ्यासाठी हा धक्का नाही,''हेही अश्विनने म्हटले.

''एके दिवशी मी भारत-श्रीलंका सामना पाहत होतो आणि भारताची गोलंदाजी खराब झाली होती. माझा आवडता सचिन तेंडुलकर होता आणि तो जेवढ्या धावा करायचा, तेवढ्या गोलंदाज प्रतिस्पर्धींना सहज द्यायच्या. तेव्हा मी ठरवलं की गोलंदाज व्हायला हवे. तेव्हा जे गोलंदाज होते त्यांच्यापेक्षा मी सरस होऊ शकत नाही का? असा बालिश विचार मी तेव्हा केला आणि म्हणूनच मी ऑफ-स्पिन करायला सुरुवात केली. मात्र, उद्या जेव्हा मी निवृत्त होईल तेव्हा मला पहिल्यांदा पश्चाताप वाटेल की इतका चांगला फलंदाज असूनही मी गोलंदाज बनायला नको होते,'' अशी खंत अश्विनने बोलून दाखवली.

''मी असे म्हणत नाही की फलंदाजाने खेळू नये. त्याने आणि गोलंदाजानेही खेळले पाहिजे. त्यांना समान वागणूक दिली पाहिजे कारण शेवटी तुम्ही देशासाठी खेळता. काहींना १० सामने, काहींना १५, काहींना २० सामने खेळण्याची संधी दिली जाते. ज्या दिवशी मी भारतीय जर्सी घातली, तेव्हा मला माहित होते की मला दोन सामने मिळतील. यासाठी तयार होतो. माझ्यावर अन्याय झाला असे मला म्हणायचे नाही,''असेही अश्विन म्हणाला.

अश्विन म्हणाला की,''आता संघात मित्र नाहीत, सहकारी आहेत. ही अशी वेळ आहे जिथे प्रत्येक खेळाडू सहकारी असतो. एक काळ असा होता की क्रिकेटमध्ये संघ सहकारी तुमचे मित्र होते. आता ते सहकारी आहेत. यात मोठा फरक आहे. कारण इथे लोकांना स्वतःला पुढे न्यायचे असते. त्यामुळे कोणाला विचारायला वेळ नाही की काय करतोस. हा एकाकी प्रवास आहे.''