Gautam Gambhir: पृथ्वी शॉ आणि ईशान किशन ट्वेंटी-20 मध्ये कायमस्वरूपीचे सलामीवीर असावेत - गौतम गंभीर

ishan kishan and prithvi shaw: पृथ्वी शॉ आणि ईशान किशन ट्वेंटी-20 मध्ये कायमस्वरूपीचे सलामीवीर असावेत असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

भारतीय संघाने 3 सामन्यांच्या वन डे मालिकेत श्रीलंकेला 3-0 ने पराभूत करून नवा इतिहास रचला आहे. रविवारी झालेला अखेरचा सामना भारतीय संघाने तब्बल 317 धावांनी आपल्या नावावर केला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 5 बाद 390 धावा केल्या होत्या.

विराट कोहली नाबाद (166) आणि शुबमन गिलच्या (116) धावांच्या खेळीमुळे भारताने श्रीलंकेसमोर धावांचा डोंगर उभारला. 391 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना पाहुण्या श्रीलंकेच्या संघाला पूर्णपणे अपयश आले. श्रीलंकेचा संघ संपूर्ण 50 षटके पण खेळू शकला नाही आणि 22 षटकांत केवळ 73 धावांवर गारद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी 2-2 बळी घेण्यात यश आले.

अशातच भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने भारताच्या ट्वेंटी-20 संघाबद्दल एक मोठे विधान केले आहे. पृथ्वी शॉ आणि ईशान किशन हे भारताच्या ट्वेंटी-20 संघाचे कायमस्वरूपीचे सलामीवीर असावेत असे गंभीरने म्हटले आहे.

पृथ्वी शॉने अलीकडेच न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन केले आहे. ही मालिका 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

पृथ्वीने याआधी 5 कसोटी, 6 वन डे आणि 1 ट्वेंटी-20 सामना खेळला आहे, खरं तर तो जुलै 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यापासून भारताकडून खेळला नाही. तसेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार धावा आणि रणजी ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावल्यामुळे शॉला भारतीय संघात पुनरागमन करण्यात मदत झाली.

अशातच गौतम गंभीरने भारतीय संघ व्यवस्थापनाला 23 वर्षीय शॉसोबत टिकून राहण्याचा सल्ला दिला आहे. डिसेंबर 2018 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या गंभीरने सांगितले की, पृथ्वी शॉ असा खेळाडू आहे जो गोलंदाजांच्या अडचणीत वाढ करू शकतो आणि सामना जिंकवण्याची त्याच्यात क्षमता

पृथ्वी शॉचे कौतुक करताना गंभीरने म्हटले, "त्याला भारतीय संघातून बाहेर काढायला नको होते. कारण त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने भारताला स्फोटक सुरुवात करून दिली आहे. ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव भारतासाठी ज्या फळीत बसतात तिथेच पृथ्वी शॉ देखील तंतोतंत बसतो. आता तुम्ही शॉला निवडले आहे, त्याच्यासोबत टिकून राहा", असे गंभीरने स्टार स्पोर्ट्सवर सांगितले.

"प्रत्येक मालिकेद्वारे पृथ्वी शॉची तुलना करू नका. तो युवा आहे असून एक स्फोटक खेळाडू आहे आणि तो मॅचविनरही आहे. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये घ्या आणि त्याला जास्त काळ संघात ठेवा", असे गंभीरने अधिक सांगितले.

शुबमन गिलने याच वर्षाच्या सुरूवातीला श्रीलंकेविरूद्ध ट्वेंटी-20 मध्ये पदार्पण केले आहे. त्यामुळे त्याने कसोटी आणि वन डे क्रिकेटवर अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचा सल्ला गंभीरने दिला.

शुबमन गिलने वन डे आणि कसोटी क्रिकेटवर लक्ष केद्रींत करावे. तसेच पृथ्वी शॉ आणि ईशान किशन ट्वेंटी-20 मध्ये कायमस्वरूपीचे सलामीवीर असावेत असे मत गौतम गंभीरने व्यक्त केले.

अलीकडेच न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे, ज्यामध्ये पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. 3 सामन्यांची ट्वेंटी-20 मालिका 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी ट्वेंटी-20 संघ - हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार.