मुंबईच्या पहिल्या डावातील २२४ धावांच्या प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर गडगडला. मुंबईने पहिल्या डावात ११९ धावांची आघाडी घेतली. अजिंक्य रहाणेने दुसऱ्या डावात १४३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ७३ धावा केल्या. श्रेयस अय्यरने १११ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९५ धावा केल्या.
१९ वर्षीय मुशीर खान याने ३२६ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने १३६ धावांची खेळी केली. मुंबईने दुसऱ्या डावात सर्वबाद ४१८ धावा केल्या. मुंबईने तिसऱ्या दिवसअखेर विदर्भ संघासमोर विजयासाठी ५३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. विदर्भाने बिनबाद १० धावा केल्या आहेत.
मुशीर खान हा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज बनला आहे. त्याने महान सचिन तेंडुलकरचा २९ वर्षांचा विक्रम मोडला. १९ वर्षे १४ दिवस वयाच्या मुशीरने अंतिम फेरीत मुंबईच्या दुसऱ्या डावात शतक झळकावले.
सचिनने १९९४-९५ च्या मोसमात त्याच्या २२ व्या वाढदिवसाच्या एक महिना आधी पंजाबविरुद्ध दोन शतके झळकावून रणजी फायनलमध्ये शतक झळकावणारा मुंबईचा सर्वात तरुण फलंदाज होण्याचा विक्रम केला होता.
योगायोगाने मुशीरने ही कामगिरी केली तेव्हा सचिन तेंडुलकर स्टँडवर उपस्थित होता आणि या युवा खेळाडूला त्याचा विक्रम मोडताना पाहत होता. तत्पूर्वी मुशीरने बडोद्याविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आपल्या पहिल्या प्रथम श्रेणीतील शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर केले होते. वसीम जाफरनंतर हा विक्रम करणारा तो मुंबईचा दुसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला.