Ruturaj Gaikwad : इरादा पक्का, दक्षिण आफ्रिकेचा दौरा; ऋतुराज गायकवाडचा तुफान फॉर्म, चार शतकं, ६०३ धावा, ५१ चौकार अन् १९ षटकार

Maharashtra Captain Ruturaj Gaikwad ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे.

Ruturaj Gaikwad : भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयनं कसोटी संघ जाहीर केला आहे, परंतु वन डे मालिकेसाठी संघ जाहीर करण्यापूर्वी निवड समितीचे सारे लक्ष हे विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare 2021-22 ) स्पर्धेतील कामगिरीवर आहे.

एकीकडे शिखर धवन ( Shikhar Dhawan) कामगिरीशी झगडत असताना वेंकटेश अय्यर, केएस भारत, मनन वोहरा आणि ऋतुराज गायकवाड हे युवा खेळाडू टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी दावा सांगताना दिसत आहे. त्यामुळे शिखर धवनचा मार्ग आणखी खडतर बनला आहे.

ऋतुराज गायकवाडनं यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक ६०३ धावांचा पराक्रम केला आहे. त्यानं केवळ पाच सामन्यांत चार शतकांसह ही आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेश ( १३६ धावा), छत्तीसगड ( १५४*), केरळा ( १२४) व चंडिगढ ( १६८*) अशी चार शतकं ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीत झळकावली आहेत. विराट कोहली ( २००८-०९), पृथ्वी शॉ ( २०२०-२१) व देवदत्त पडिक्कल ( २०२०-२१) यांच्यानंतर एका पर्वात चार शतकं करणारा तो चौथा फलंदाज बनला.

आज चंडिगढ संघाविरुद्धच्या सामन्यात ३१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराजनं पुन्हा एकदा कर्णधाराला साजेशी खेळी केली. प्रथम फलंदाजी करताना मनन वोहराच्या १४१ धावा आणि अर्सलान खान ( ८७) व ए कौशिक ( ५६) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चंडिगढनं ७ बाद ३०९ धावा केल्या.

महाराष्ट्राच्या पी दाधे यानं ४९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ऋतुराज गायकवाड व वाय नाहर यांनी पहिल्या विकेटसाठी १०९ धावा जोडल्या. पण, नाहर ३८ धावांवर माघारी परतल्यानंतर महाराष्ट्राची गाडी घसरली. राहुल त्रिपाठी ( ०), अंकित बावणे ( १२), नौशाद शेख ( ०) हे झटपट माघारी परतले. ऋतुराजनं १३२ चेंडूंत १२ चौकार व ६ षटकारांसह १६८ धावांची खेळी केली. ए काझीनं नाबाद ७३ धावा करताना महाराष्ट्राला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला.

विजय हजारे ट्रॉफी २०२१-२२मध्ये आजची १६८ धावांची खेळी ही ऋतुराजची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. त्यानं या स्पर्धेत १५०.७५च्या सरासरीनं धावा कुटल्या. त्यानं एकूण ५१ चौकार व १९ षटकारही लगावले. ऋतुराजच्या या कामगिरीनंतर त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी दुर्लक्षित करणे अवघड आहे. पण, त्याला अंतिम ११मध्ये खेळण्याची संधी मिळेल की नाही, यावर शंका आहे. रोहित शर्मा व लोकेश राहुल असताना त्याला संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे.