फक्त १२ धावा! त्यातही कोहलीनं साधला विक्रमी डाव; टी-२० त असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीची हवा

आयपीएलच्या १८ व्या हंगामात किंग कोहलीच्या आरसीबीनं दिमाखदार विजय नोंदवत चौथ्यांदा फायनल गाठली आहे.

पंजाबच्या संघाने दिलेल्या अल्प धावसंख्येचा पाठलाग करताना विराट कोहली अवघ्या १२ धावांवर बाद झाला. पण या छोट्याखानी खेळीसह त्याने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

टी-२० क्रिकेमध्ये त्याने १३५०० धावांचा पल्ला पार केला आहे. क्रिकेटच्या छोट्या प्रारुपात हा टप्पा गाठणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरलाय. विराट कोहली हा टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्या खात्यात आता आणखी एका खास विक्रमाची नोंद झालीये.

आयपीएलमध्ये विराट कोहलीची कामगिरी दमदार राहिली आहे. यंदाच्या हंगामात १४ सामन्यात त्याने ८ अर्धशकासह ६१४ धावा केल्या आहेत. RCB ला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी फायनलमध्येही त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.

विराट कोहलीने टी २० क्रिकेटमध्ये ४१३ सामन्यात एकूण १३५०० धावा करताना ९ शतकांसह १०५ अर्धशतके झळकावली आहेत.

ख्रिस गेलनं २००५ ते २०२२ या कालावधीत ४६३ सामन्यातील ४५५ डावात २२ शतके आणि ८८ अर्धशतकाच्या मदतीने १४५६२ धावा केल्या आहेत.

एलेक्स हेल्स या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. २००९ ते २०२५ पर्यंत ४९६ टी-२० सामन्यात त्याने ७ शतके आणि ८६ अर्धशतकासह १३६९८ धावा केल्याचा रेकॉर्ड आहे.

पाकिस्तानचा शोएब मलिक याने २००५ ते २०२५ या कालावधीत ५५७ सामन्यात ८३ अर्धशतकाच्या मदतीने १३५७१ धावा केल्या आहेत.

केरॉन पोलार्डनं २००६ ते २०२५ या कालावधीत ६९५ सामन्यात १३५३७ धावा केल्या आहेत.