IPL च्या यंदाच्या हंगामात गोलंदाजीत दमदार कामगिरी करणाऱ्या अंशुल कंबोज याला बीसीसीआयने मोठं बक्षीस दिलं. श्रीलंका दौऱ्यावरील तिरंगी वनडे मालिकेसाठी त्याची इंडिया 'अ' संघात वर्णी लागली.
आयपीएलमध्ये पर्पल कॅपच्या शर्यतीत असणाऱ्या या गोलंदाजावर CSK च्या संघाला प्लेऑफ्स तिकीट मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आहे. पण टीम इंडियात वर्णी लागल्यावर लखनौ विरुद्धच्या सामन्यात त्याची चांगलीच धुलाई झाली.
LSG विरुद्धच्या सामन्यात २.४ षटकात म्हणजे फक्त १४ चेंडूत त्याने ८ षटकार आणि ३ चौकारासह ६३ धावा खर्च केल्या. एका सामन्यात सर्वाधिक षटकार देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत यश दयालसोबत तो संयुक्तरित्या अव्वलस्थानी आहे.
२०२३ च्या हंगामात गुजरात टायटन्सच्या ताफ्यातून यश दयाल याने कोलकाता नाईट विरुद्धच्या सामन्यात ८ षटकार खाल्ले होते. यात रिंकू सिंह याने एका षटकात मारलेल्या ५ षटकारांचा समावेश होता.
IPL च्या इतिहासात एका सामन्यात ३ किंवा त्यापेक्षा कमी षटकात ६० पेक्षा अधिक धावा खर्च करणारा अंशुल कंबोज हा दुसरा गोलंदाज ठरला.
या आधी गत हंगामात चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यातील खलील अहमदने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध एकही विकट न घेता ६५ धावा खर्च केल्या होत्या.