आयपीएलचे साखळी फेरीचे सामने संपले. आजपासून प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. आज न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये क्वालिफायर-१ सामना होणार आहे.
पंजाब किंग्ज (Punjab Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bengaluru) यांच्यात हा हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. या क्रिकेट स्टेडियममध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
यंदाच्या IPL हंगामात आधी ऑपरेशन सिंदूरमुळे स्पर्धेतील काही सामने पुढे ढकलले गेले. आणि नंतर पावसाने लवकर हजेरी लावल्याने काही सामने रद्द करण्याची नामुष्की ओढवली. दोन्ही संघांचे १-१ सामने पावसाने वाया घालवले.
साखळी फेरीतील सामन्यात पावसाने सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण दिला जात होता. पण प्लेऑफच्या सामन्यात निकाल लागणे हे पुढील स्पर्धेसाठी महत्त्वाचे आहे. अशा वेळी BCCI ने वेगळे नियम तयार केले आहेत.
२२ मे रोजी सामील करून घेतलेल्या नव्या नियमावलीनुसार, प्लेऑफमधील फायनलचा सामना वगळता इतर कुठल्याही सामन्याला राखीव दिवसाचा पर्याय नाही. अशावेळी सामन्याचा निकाल कसा लावला जाणार, समजून घेऊया.
क्वालिफायर १, २ किंवा एलिमिनेटर या तीनपैकी कुठल्याही सामन्याचा निकाल नियमित सामन्यात लागला नाही, तर हा सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल. आणि सामन्याचा निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर्स खेळवल्या जातील.
यात आणखी नियम असा की, जर पावसामुळे किंवा इतर कुठल्याही अपरिहार्य कारणाने सामना किंवा सुपर ओव्हर होऊच शकली नाही, तर मात्र गुणतालिकेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या संघाला विजेता मानून पुढील फेरीत पाठवले जाईल.
याचाच अर्थ, जर पावसामुळे किंवा कुठल्याही कारणाने पहिल्या दोन सामन्यांचा निकाल लागला नाही, तर गुणतालिकेतील अव्वल असलेल्या पंजाब संघाला विजेता घोषित केले जाईल. आणि एलिमिनेटर मध्ये गुजरातचा संघ विजयी ठरेल.