IPL 2025 Final : आरसीबीचा चौथा तर पंजाबचा दुसरा प्रयत्न! याआधी कुणाच्या कॅप्टन्सीत काय घडलं?

दोन्ही संघांनी कोणाच्या कॅप्टन्सीत कधी फायनल खेळळीये? जाणून घ्या सविस्तर

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात फायनल रंगणार आहे. दोन्ही संघ पहिल्या हंगामापासून स्पर्धेत सहभागी होत आहेत. पण दोन्ही संघाने आतापर्यंत एकदाही IPL ट्रॉफीवर नाव कोरलेले नाही.

दोन्ही संघातील कमालीचा योगायोग म्हणजे २०१६ च्या हंगामात २९ मे रोजी आरसीबीनं फायनल गमावली होती. २०२५ च्या हंगामात २९ मे रोजीच ९ वर्षांनी ते फायनलमध्ये पोहचले आहेत. दुसरीकडे पंजाब किंग्जच्या संघाने १ जून २०१४ मध्ये फायनल गमावल्यावर ११ वर्षांनी १ जून २०२५ रोजी रंगलेल्या सामन्यात फायनल तिकीट बूक केले.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ यंदाच्या हंगामात चौथ्या प्रयत्नात ट्रॉफी जिंकण्यासाठी जोर लावणार आहे. दुसरीकडे पंजाबचा हा दुसरा प्रयत्न असेल. इथं एक नजर टाकुयात आतापर्यंत दोन्ही संघांनी कुणाच्या कॅप्टन्सीत फायनल गाठली अन् त्यांच्या ट्रॉफी आड कोण आलं? यासंदर्भातील माहिती

आयपीएलच्या दुसऱ्याच हंगामात म्हणजे २००९ मध्ये आरसीबीचा संघ पहिली फायनल खेळला. अनिल कुंबळे या दिग्गजाच्या नेतृत्वाखालील संघाला ॲडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखालील डेक्कन चार्जर्सच्या संघाने मात दिली होती.

२०११ च्या हंगामात RCB च्या संघाने डॅनियल व्हिटोरीच्या नेतृत्वाखाली फायनल खेळली. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने २०५ धावांचा पाठलाग करताना बंगळुरुचा संघ १४७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. दुसऱ्यांदा त्यांचे ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न अधूर राहिले.

२०१६ च्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली फायनल खेळली. यावेळी डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा संघ त्याच्या ट्रॉफी आड आला होता.

आता रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली चौथ्या प्रयत्नात तरी आरसीबीचा संघ ट्रॉफी उंचावण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल.

शाहरुखच्या संघाला चॅम्पियन केल्यावर आता श्रेयस अय्यर प्रीतीचं स्वप्न साकार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तो यात यशश्वी ठरणार का ते पाहण्याजोगे असेल.