Rohit Sharma Team India : रोहित शर्माला T20 आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व मिळण्याची शक्यता, लवकरच होणार निवड समितीची बैठक

Rohit Sharma Team India Captain : येत्या काळात रोहित शर्माच्या हाती टीम इंडियाच्या एकदिवसीय आणि T20 संघाचं नेतृत्व येण्याची शक्यता आहे.

येत्या काळात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) गळ्यात टीम इंडियाच्या (Team India) एकदिवसीय (Oneday International) आणि T20 संघाचं कर्णधारपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. लवकरच निवड समिती यावर अंतिम मोहरही लावेल.

स्पोर्ट्स वेबसाईट इन्साईड स्पोर्ट्सनं भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) च्या सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, विराट कोहली (Virat Kohli) हा कसोटी संघाचा (Test Cricket) कर्णधार म्हणून कायम राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

रिपोर्टनुसार BCCI च्या अधिकाऱ्यांनी तिन्ही फॉर्मेटसाठी निरनिराळे कर्णधार बनवण्याचं खंडन केलं आहे. विराट कोहलीनं यापूर्वीच विश्वचषक सामन्यानंतर T20 सामन्याचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. वर्क लोडचं कारण देत त्यानं आपला राजीनामा BCCI ला सुपूर्द केला आहे.

कोहलीनं यापूर्वी ट्विटरवर पत्र ट्वीट केलं होतं. त्यात त्याने हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं होचं. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, कोच रवी शास्त्री आणि सहकारी रोहित शर्मा यांच्यासोबत चर्चा करुन हा निर्णय घेतल्याचं कोहलीनं म्हटलं होतं.

गेल्या आठ- नऊ वर्षांतील कामाचं ओझं पाहता असं करण्याची गरज होती. मी मागच्या ५-६ वर्षांपासून तिनही प्रकारात नियमितपणे नेतृत्व सांभाळत आहे. वन डे आणि कसोटी संघाचं पूर्णपणे नेतृत्व करण्यासाठी स्वत:ला अधिक ‘स्पेस’ देणं गरजेचं वाटत असल्यामुळं मी झटपट क्रिकेटचं नेतृत्व स्वत:कडे ठेवू इच्छित नाही, असं तो म्हणाला होता.

टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अतिशय खराब झाली आहे. पाकिस्तान, न्यूझीलंडविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागल्यानं टीम इंडियाच्या उपांत्य फेरीच्या आशा मावळल्या आहेत. भारतीय संघाला गट साखळीतच गाशा गुंडाळावा लागण्याची शक्यता आहे.

आयपीएल पाठोपाठ विश्वचषक स्पर्धा खेळल्याचा परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे बीसीसीआयनं न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्त्व के. एल. राहुलकडे दिलं जाऊ शकतं.

बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेतृत्त्वासाठी सर्वाधिक पसंती राहुलला आहे. 'वरिष्ठ खेळाडूंना विश्रांतीची गरज आहे. के. एल. राहुल संघाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे तोच संघाचं नेतृत्त्व करेल हा निर्णय जवळपास निश्चित आहे,' अशी माहिती त्यांनी दिली. या मालिकेत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल. मात्र त्यांना कोविड-१९ प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करावं लागेल.

टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर न्यूझीलंडचा संघ भारतात येईल. भारत वि. न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-२० मालिका होईल. या मालिकेला १७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. १७, १९ आणि २१ नोव्हेंबरला सामने होतील. जयपूर, रांची आणि कोलकात्यात हे सामने खेळवले जातील. त्यानंतर २५ नोव्हेंबरला कानपूरमध्ये पहिला कसोटी सामना रंगेल. ३ ते ७ डिसेंबर दरम्यान मुंबईत दुसरी कसोटी होईल.

२०२३ पर्यंत दोन विश्वचषक स्पर्धा होणार आहेत. २०२२ मध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये टी २० विश्वषचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. तर २०२३ मध्ये भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचं आयोजन केलं जाणारआहे. या स्पर्धांपूर्वी रोहित शर्माला आपली टीम तयार करण्याची संधीही मिळणार आहे.

कर्णधार म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड उत्तम आहे. त्यानं १९ सामन्यांमध्ये भारतीय संघाचं कर्णधारपद भूषवलं आहे. त्यापैकी १५ सामन्यांमध्ये त्याला विजय मिळाला आहे. तर IPL स्पर्धेत त्यानं आपल्या संघाला ५९.६८ टक्के सामने जिंकवले आहेत.

रोहित शर्मा हा एकमेव असा कर्णधार आहे ज्याच्या नावे पाच आय़पीएल ट्रॉफी आहेत. भारताचं कर्णधारपद भूषवतानाही त्यानं फलंदाजाच्या रूपात चांगली कामगिरी केली आहे. त्यानं कर्णधारपदी असताना ४१.८८ च्या सरासरीनं ७१२ धावा केल्या आहेत. तसंच त्यानं दोन शतक आणि पाच अर्धशतकही ठोकली आहेत.

Read in English