Hardik Pandya IND vs IRE: दुसऱ्या टी२० साठी हार्दिक पांड्या संघात करणार ३ बदल; 'या' खेळाडूंचा पत्ता कट?

आयर्लंड विरूद्ध उद्या रंगणार दुसरा टी२० सामना

Hardik Pandya India vs Ireland T20: आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला. हार्दिक पांड्याने कर्णधारपदाच्या कारकिर्दीची विजयी सलामी देत संघाला मालिकेत १-०ची आघाडी मिळवून दिली.

आयर्लंडच्या संघाने हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या जोरावर १२ षटकांत १०८ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात दीपक हुडाच्या नाबाद ४७ धावांच्या जोरावर भारताने हे आव्हान दहाव्या षटकातच पार केले.

भारतीय संघाने पहिल्या दमदार विजय मिळवला असला तरीही दुसऱ्या टी२० साठी कर्णधार हार्दिक पांड्या संघातून ३ खेळाडूंचा पत्ता कट करण्याच्या तयारीत असल्याचे बोललं जातंय. पाहूया कोण असतील ते खेळाडू-

आवेश खान- शेवटच्या पाच षटकांत आयर्लंडच्या फलंदाजांनी ५२ धावा केल्या. आवेश खानविरुद्ध फलंदाजांनी खूप धावा केल्या. त्याने आपल्या २ षटकात २२ धावा दिल्या आणि एकच विकेट घेतली. आवेश खान या सामन्यात आपली लय गमावताना दिसला. अशा स्थितीत कर्णधार हार्दिक पांड्या दुसऱ्या टी२० सामन्यात अर्शदीप सिंगला संधी देऊ शकतो.

अक्षर पटेल- या स्टार अष्टपैलू खेळाडूला आयर्लंडविरुद्ध आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला फलंदाजी मिळाली नाही आणि गोलंदाजीत तो फ्लॉप ठरला. अक्षर पटेलला फक्त १ षटक टाकायला मिळाले आणि त्यात त्याने १२ धावा दिल्या. अशा स्थितीत दुसऱ्या टी २० सामन्यात त्याच्या जागी व्यंकटेश अय्यरला संधी दिली जाऊ शकते.

सूर्यकुमार यादव- IPL 2022 मध्ये सूर्यकुमार जखमी झाला होता. दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या सूर्यकुमार यादवला पहिल्या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. आयर्लंडविरुद्ध त्याला खातेही उघडता आले नाही. आयर्लंड सारख्या कमकुवत संघाविरुद्ध त्याला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. सूर्यकुमार यादव हा बडा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.