भारताने ५७ वेळा ऑस्ट्रेलियाला हरवलेय, पण वर्ल्ड कप फायनलची गोष्ट वेगळी! इथे खरी कसोटी

India vs Australia World Cup 2023 : भारतीय संघाने यंदाच्या पर्वात सांघिक खेळी करून सलग दहा विजय मिळवले.

मागील महिन्याच्या सुरूवातीला सुरू झालेली वन डे विश्वचषकाची स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी फायनलमध्ये स्थान मिळवले असून १९ तारखेला अंतिम सामना होणार आहे.

भारतीय संघाने यंदाच्या पर्वात सांघिक खेळी करून सलग दहा विजय मिळवले. मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या त्रिकुटाने भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळली.

आघाडीचे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचा संघाला फायदा झाला. कर्णधार रोहित शर्मा स्फोटक सुरूवात करून चांगली सुरूवात करून देत आहे.

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांना रोखण्याचे आव्हान कांगारूच्या गोलंदाजी अटॅकसमोर असेल.

आकडेवारी पाहिली तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचा वरचष्मा आहे, पण भारतीय संघ देखील या शर्यतीत कमी नसून ५७ वेळा कांगारूंना पराभवाची धूळ चारण्यात टीम इंडियाला यश आले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १५० वन डे सामने झाले आहेत. भारताला ५७ सामन्यांत विजय मिळवता आला तर ऑस्ट्रेलियाने ८३वेळा विजय साकारला आहे. पण, यंदाच्या पर्वातील टीम इंडियाचा फॉर्म पाहता भारत कांगारूंना भारी पडेल अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

भारताने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. आता भारतासमोर फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. २० वर्षे जुना बदला घेण्याचे लक्ष्य भारतासमोर असेल. कारण २००३ च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून जगज्जेतेपद पटकावले होते.

यंदाच्या पर्वातील भारताचा सलामीचा सामना ऑस्ट्रेलियासोबतच झाला होता. चेन्नई येथे झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना केवळ १९९ धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग करताना भारताला सुरूवातीला तीन मोठे धक्के बसले होते.

ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नर (४१), स्टीव्ह स्मिथ (४६) आणि मार्नल लाबूशेन (२७) धावा केल्या होत्या. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक (३) बळी घेऊन कांगारूंना २००च्या आत रोखले होते.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर स्वस्तात माघारी परतले. पण, विराट कोहली (८५) आणि लोकेश राहुलच्या नाबाद (९७) धावांच्या जोरावर भारताला विजयी सलामी देण्यात यश आले.