India vs England 5th Test : सराव सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू पाचव्या कसोटीत इंग्लंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पण, कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने टीम इंडियाची धाकधुक वाढली आहे आणि खबरदारीचा उपाय म्हणून BCCI ने संकटमोचकाला बोलावले आहे.
इंग्लंडचा संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली फॉर्मात आलेला दिसतोय... जो रूटने कर्णधारपदावरून हटण्याचा निर्णय घेतला आणि बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मालिकेत इंग्लंड ३-० अशा फरकाने न्यूझीलंडला पराभूत करण्याच्या मार्गावर आहे. अशात रोहितचे संघात नसणे टीम इंडियाचे टेंशन वाढवणारे आहे.
लिसेस्टरशायर क्लबविरुद्धच्या सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहित फलंदाजीला आलाच नाही. त्यानंतर सायंकाळी बीसीसीआयने ट्विट करून सांगितले की, रोहितचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. २५ जूनला रोहितची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर रोहित आता पाच दिवस विलगिकरणार राहणार आहे. ३० जूनला त्याची दोन वेळा RT-PCR चाचणी करण्यात येईल आणि ती निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला खेळता येईल. भारताच्या अन्य खेळाडूंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे आणि ते मंगळवारी बर्मिंगहॅमसाठी रवाना होतील.
''रोहित शर्मा कसोटीसाठी उपलब्ध होईल, याची शक्यता फार कमी आहे. तो जरी तंदुरूस्त असला तरी ३० जूनच्या रात्रीपर्यंत त्याच्या दोन्ही कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह यायला हव्यात. तो संघासोबत बर्मिंगहॅम येथे प्रवास करणे अवघड आहे,''असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
रोहितच्या जागी कसोटीसाठी बॅक-अप म्हणून मयांक अग्रवाल व ऋतुराज गायकवाड यांच्या नावावर चर्चा झाली, परंतु संघ व्यवस्थापनाने मयांकला बोलावण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुल दुखापतग्रस्त झाल्यानंतर मयांकला बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत स्टँड बाय म्हणून राहण्यास सांगितले होते आणि आता तेथून तो लंडनसाठी रवाना झाला आहे.
रोहित शर्मा वेळेत तंदुरुस्त न झाल्यास शुबमन गिलसह सलामीसाठी तीन पर्याय सध्या संघात आहेत. केएस भरत, हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यापैकी एक गिलसह पाचव्या कसोटीत ओपनिंगला येऊ शकतो. मयांकला बॅक अप म्हणून बोलावले गेले आहे.
दरम्यान, बीसीसीआय पाचव्या कसोटीसाठी कर्णधाराची घोषणा करण्याची कोणतीच घाई करू इच्छित नाही. जसप्रीत बुमराहला नेतृत्व करण्यासाठी तयार राहण्यास सांगितले आहे, रिषभ पंत कसोटीत नेतृत्व करण्यासाठी अद्याप तयार नसल्याचे बीसीसीआयला वाटते.
भारताचा संघ - रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा