IND vs AUS Warm Up Match Live : ऑस्ट्रेलियावरील विजयानंतरही रोहित शर्मा नाराज; सूर्यकुमारचा दाखल देत टोचले इतरांचे कान

India vs Australi Warm Up Match Live : भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारताने जरी सामना जिंकला असला तरी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) नाराज दिसला...

India vs Australi Warm Up Match Live : भारतीय संघाने पहिल्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. लोकेश राहुल ( KL Rahul) व सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने १८७ धावांचे लक्ष्य उभे केले. ऑसी कर्णधार अ‍ॅरोन फिंचने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. पण, हर्षल पटेल व मोहम्मद शमी यांनी अखेरच्या दोन षटकांत सामना फिरवला. भारताने जरी सामना जिंकला असला तरी कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) नाराज दिसला...

लोकेशने ३३ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावा केल्या. रोहित शर्मा ( १५), विराट कोहली ( १९), हार्दिक पांड्या (२) व दिनेश कार्तिक (२०) अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने ३३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ५० धावा केल्या. भारताने ७ बाद १८६ धावा केल्या. केन रिचर्डसनने चार विकेट्स घेतल्या. यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांना सडेतोड उत्तर दिले. मिचेल मार्श ( ३५) व अ‍ॅरोन फिंच यांनी पॉवर प्लेमध्ये ६४ धावा चोपल्या. स्टीव्हन स्मिथ ( ११) , ग्लेन मॅक्सवेल ( २३), मार्कस स्टॉयनिस ( ७) हे झटपट बाद झाले.

१२ चेंडूंत विजयासाठी १६ धावा हव्या असताना हर्षल पटेलने संथ चेंडूवर फिंचचा त्रिफळा उडवला. त्याने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. हर्षलच्या त्या षटकात ५ धावा गेल्या, परंतु दोन महत्त्वाच्या विकेट्स मिळाल्या. ऑसींना ६ चेंडूंत ११ धावा करायच्या होत्या. मोहम्मद शमीला गोलंदाजीला बोलावले गेले. त्याने चार चेंडूंत सलग चार ( एक रन आऊट) धक्के देताना संघाची हॅटट्रिक पूर्ण केली आणि ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १८० धावांत माघारी पाठवला.

''आम्ही चांगली फलंदाजी केली. आम्ही आणखी १०-१५ धावा जोडू शकलो असतो. शेवटपर्यंत टीकून फलंदाजी करायला येता आले पाहिले. जे सूर्यकुमार यादवने करून दाखवले. ही चांगली खेळपट्टी होती, जिथे तुम्ही आमच्या फलंदाजांनी केलेल्या पुनरागमनावर विश्वास ठेवू शकता. मोठ्या स्टेडियमवर चतुर खेळ करता आला पाहिजे. ते मिळवणे महत्वाचे आहे. त्याचवेळी एका षटकात ८-९ धावा जमा करण्यासाठी एकेरी आणि दुहेरी धावा मिळवणे तितकेच महत्त्वाचे आहे.पर्थवर सराव करताना आम्ही त्यावर लक्ष केंद्रित केले आहे,'' असे रोहित शर्माने सामन्यानंतर म्हटले.

तो पुढे म्हणाला,'' डेथ ओव्हरमध्ये कामगिरी सुधारण्याची गरज आहे. अचूक गोलंदाजी आणि योग्या डावपेच आखता आले पाहिजे. एकूणच, तो आजचा खेळ चांगला झाला. ही चांगली खेळपट्टी होती आणि त्यांच्या फलंदाजांनी आमच्यावर दडपण आणले. डेथ ओव्हरला शमीला गोलंदाजीला आणण्याची योजना होती आणि त्याने काय केले ते तुम्ही पाहिले.''