भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट घेत आहे. या मालिकेतही त्याच्याकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याची अपेक्षा आहे. त्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत आणखी २३ विकेट्स घेतल्यात तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरेल. त्याला अनिल कुंबळेचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध १११ बळींचा विक्रम मोडण्याची संधी आहे. अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत १८ सामन्यात ८९ बळी घेतले आहेत.
भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठी ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे. मर्यादित षटकांमध्ये दमदार फॉर्ममधून पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. विराट कोहलीने या मालिकेत तीन शतके ठोकल्यास तो बॉर्डर-गावस्कर मालिकेत सर्वाधिक शतकं झळकावणारा फलंदाज ठरेल. सध्या या मालिकेत सर्वाधिक शतके सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत, त्याने ३४ सामन्यांत ९ शतकं झळकावली आहेत. विराट कोहलीच्या नावावर २० सामन्यांमध्ये ७ शतकं आहेत.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमधील महान फलंदाजांच्या यादीत आपले नाव प्रस्थापित केले आहे. स्मिथ ९ हजार धावा पूर्ण करण्याच्या जवळ आहे. या मालिकेत त्याला सर्वात जलद ९,००० कसोटी धावा पूर्ण करण्याची संधी आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज कुमार संगकाराने १७२ डावांत ९००० कसोटी धावा केल्या आहेत, तर स्मिथने आतापर्यंत १६६ डावांत ८६४७ धावा केल्या आहेत. त्याला नऊ हजार धावा पूर्ण करण्यासाठी ३५३ धावांची गरज आहे. भारताविरुद्धच्या मालिकेत त्याने हा पराक्रम केल्यास तो सर्वात जलद ९००० धावा करणारा फलंदाज ठरेल.
कसोटी कारकिर्दीत ३० शतकं झळकावणाऱ्या स्टीव्ह स्मिथला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडण्याची संधी आहे. या मालिकेत सचिन तेंडुलकरने सर्वाधिक ९ शतके झळकावली आहेत, तर दुसरीकडे स्मिथच्या नावावर ८ शतके आहेत. या मालिकेत तो आणखी २ शतकांसह सचिनला मागे टाकू शकतो.
बॉर्डर गावस्कर मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने २० कसोटीत १११ विकेट्स घेतल्या आहेत, तर लियॉनच्या नावावर २२ कसोटीत ९४ बळी आहेत, जर त्याने या मालिकेत १८ विकेट घेतल्यास तो या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज ठरेल.