Harmanpreet Kaur, IND vs AUS T20 WC semi final:"आम्ही कमनशिबी, लढलो तरी हरलो! सध्या एवढंच म्हणेन की..."; पराभवानंतर हरमनप्रीत झाली भावूक

शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देऊनही भारताच्या पदरी जिव्हारी लागणारा पराभव

Harmanpreet Kaur, IND vs AUS T20 World Cup semi final: महिला T20 विश्वचषक २०२३चा उपांत्य फेरीत भारताला ५ धावांनी अतिशय जिव्हारी लागणाऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. केपटाऊन येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली.

ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर या दोघींनी निकराची झुंज दिली पण त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

दमदार कामगिरी करूनही हाता-तोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. त्यामुळे हरमनप्रीतला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले. तिने सामना संपल्यानंतर बोलताना आपल्या भावनांना वाट करून दिली आणि काही विषयांवर रोखठोक मतं मांडली.

"यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं... जेमिमाने आम्हाला चांगली सुरूवात मिळवून दिली होती. तशा परिस्थितीत आमचा पराभव होणं हे खरंच अपेक्षित नव्हतं. जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे हे महत्त्वाचे असते. मी ज्या पद्धतीने रन आऊट झाले त्यापेक्षा कमनशिबीपणा आणखी काय असू शकतो."

"आम्ही प्रयत्न केले आणि सामना शेवटच्या चेंडूपर्यंत खेचू शकलो याचा आम्हाला अभिमान आहे. आम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यायची होती. आम्हाला प्रथम गोलंदाजी करावी लागली, पण त्याबाबत आम्हाला तक्रार नाही. पहिले दोन बळी गमावल्यानंतरही आमच्याकडे फलंदाजी होती, त्यामुळे आम्ही फारसे चिंतेत नव्हतो."

"आम्हाला आमची सर्वोत्तम कामगिरी करायची होती आणि निर्भिडपणे खेळायचे होते. आम्ही काही झेल सोडले आणि त्याचाच आम्हाला फटका बसला. सध्या इतकंच म्हणू शकतो की, आम्ही प्रयत्न केला पण आता यातून धडा घेण्याशिवाय पर्याय नाही."