"विराट कोहली आमच्या काळात असता तर...", पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं मोठं विधान

shoaib akhtar on virat kohli: विराट आता ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आघाडीचा फलंदाज विराट कोहली म्हणजे कव्हर ड्राईव्हचा राजा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. किंग कोहली आताच्या घडीला सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

विराटने अलीकडच्या काळात जे काही केले ते फार कमी खेळाडूंना करता आले आहे. अलीकडेच २०२३ च्या वन डे विश्वचषकात त्याने वन डे क्रिकेटमध्ये ५० शतके झळकावून सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला.

पण, विराट कोहली आमच्या काळात असता तर त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले असते, असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरने म्हटले आहे.

वृत्तसंस्था ANI शी बोलताना अख्तरने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तो म्हणाला की, आताच्या घडीला सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक धावांची नोंद आहे. रिकी पाँटिंग, ब्रायन लारा, वसिम अक्रम आणि शेन वॉर्न यांच्यासह महान खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे.

मात्र, विराट कोहली आमच्या जमान्यात असता तर त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला असता, असेही त्याने सांगितले.

विराट कोहलीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले असते. पण आताच्या तुलनेत त्यावेळी देखील त्याने तेवढ्याच धावा केल्या असत्या. पण वसिम अक्रमच्या गोलंदाजीचा सामना करणे सोपे काम नव्हते. विराट हा विराट आहे. तो या शतकातील महान फलंदाज आहे. या कालावधीची आणि त्या कालावधीची तुलना आपण करू शकत नाही. किंग कोहलीने १०० शतके झळकावीत अशी माझी इच्छा आहे, असे अख्तरने आणखी सांगितले.

ICC ट्वेंटी-२० विश्वचषक २०२२ पासून विराट कोहली ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये खेळला नव्हता. पण अफगाणिस्तानविरूद्धच्या मालिकेतून त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये पुनरागमन केले.

विराट काही कारणास्तव अफगाणिस्तानविरुद्धचा पहिला ट्वेंटी-२० सामना खेळू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने १६ चेंडूत २९ धावांची खेळी केली. तिसऱ्या सामन्यातही विराटला मोठी खेळी करता आली नाही.

विराट आता ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. कारण २०२४ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळणार नाही.