भारतीय गोलंदाजांचे इंग्लंडमधील पाच अविस्मरणीय क्षण

भारताने 1932 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारताचे पहिले जलदगती गोलंदाज मोहम्मद निसार यांनी 25-28 जून 1932 या कालावधीत इंग्लंडविरूद्धच्या एकमेव कसोटीत 93 धावांवर 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यांनी इंग्लंडच्या सलामीच्या जोडीला झटपट बाद केले, परंतु 3 बाद 19 वरून पुनरागमन करताना इंग्लंडने 259 धावांचा पल्ला गाठला. त्या संपूर्ण दौ-यात निसार यांनी प्रथम श्रेणीतील कामगिरीसह 18.09च्या सरासरीने 71 विकेट घेतल्या.

2014च्या मालिकेतील दुस-या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ विजयासाठीच्या 319 धावांचा पाठलाग करत होता. 1 बाद 70 अशा सुस्थितीत असताना लंचनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेंडू इशांत शर्माकडे सोपवला. धोनीची ही खेळी यशस्वी ठरली आणि इशांतने 74 धावांत 7 विकेट घेतल्या. भारताने 28 वर्षांनंतर लॉर्ड्सवर कसोटी विजय मिळवला होता.

1986च्या इंग्लंड दौ-यातील लॉर्ड्स कसोटीत कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला होता. कपिल देव यांनी 52 धावांत 4 विकेट घेत इंग्लंडचा दुसरा डाव 180 धावांत गुंडाळला. मात्र, पहिल्या डावात चेतन शर्माने 64 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. भारताने ही कसोटी 5 विकेटने जिंकली होती.

जवागल श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद या दोन जलदगती गोलंदाजांनी 1996चा इंग्लंड दौरा गाजवला. भारताच्या या प्रमुख गोलंदाजांनी त्या दौ-यात मिळून 26 विकेट घेतल्या. श्रीनाथचे बाऊंसर आणि प्रसादची बनाना स्वींग गोलंदाजी याने इंग्लंडचे फलंदाज हैराण झाले होते. इंग्लंडचा कर्णधार मिचेल अॅथर्टन यांनी भारतीय गोलंदाज आमच्या गोलंदाजांपेक्षा वरचढ होते, अशी कबुली दिली.

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007चा इंग्लंड दौरा गाजवला. यामध्ये प्रमुख भूमिका बजावली ती झहीर खान याने. त्याने येथील वातावरणाशी जुळवून घेताना इंग्लंडच्या फलंदाजांना हतबल केले. पहिल्या डावात त्याने 59 धावांत 4 विकेट घेतल्या आणि इंग्लंडचा पहिला डाव 198 धावांत गुंडाळला. दुस-या डावातही त्याने 75 धावांत 5 विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा संघ 3 बाद 280 धावांवरून 355 धावांवर गडगडला. भारताने ही कसोटी 7 विकेट राखून जिंकली.