Photo : टीम इंडियासोबत अनुष्काची समुद्र सफर!

भारतीय संघाने ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून टीम इंडियाने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या 93 धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या 7 धावांत घेतलेल्या 5 बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा उडविला. चौथ्या दिवशी विजयासाठी 419 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दुसऱ्या डावात 100 धावांवर गारद झाला.

विंडीजच्या सर्व फलंदाजांना भारताच्या तिन्ही वेगवान गोलंदाजांनी बाद केले. इशांतने 31 धावांत 3 तर, शमीने 13 धावांत 2 बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली.

एकवेळ विंडीजच्या 9 बाद 50 धावा झाल्या होत्या. त्यानंतर केमार रोच (36) आणि कमिन्स (नाबाद 19) या जोडीने दहाव्या विकेटसाठी 50 धावा जोडत पराभव लांबविला. अखेर इशांतने रोचला बाद करीत भारताच्या विजयावर शिक्का मारला.

भारताने उपाहारानंतर एका तासाने दुसरा डाव 7 बाद 343 धावांवर घोषित केला. रहाणेने 102 धावा केल्या, तर विहारी 93 धावांवर बाद झाला. दोघांनी पाचव्या गड्यासाठी 135 धावांची भागीदारी केली. विहारी बाद होताच कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित केला.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून किंग्स्टन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने कॅरेबियन बीचवर फेरफटका मारला. यावेळी सोबत बॉलिवूड अभिनेत्री आणि कॅप्टन विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही दिसली.

विराट आणि अनुष्काचे याआधीही विंडीजमधील भटकंतीचे काही फोटो व्हायरल झाले होते.