इतरांपेक्षा माझ्यावर कामाचा दुप्पट-तिप्पट भार, बाकीचे...! हार्दिक पांड्याचा मोठा दावा

पाठीच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा होऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेल्या हार्दिक पांड्याने ( Hardik pandya) मैदानावरील कामगिरीने सर्वांना अचंबित केले आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमधील गुजरात टायटन्सची जबाबदारी मिळाली आणि त्याने त्याचे नेतृत्व कौशल्यही दाखवून दिले. त्यामुळेच त्याच्याकडे टीम इंडियाच्या ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आणि वन डे संघाचा तो उप कर्णधार आहे. आशिया चषक स्पर्धेत रविवारी भारत-पाकिस्तान सामना होणार आहे आणि यापूर्वी झालेल्या साखळी फेरीत हार्दिकने इशान किशनसह टीम इंडियाला वाचवले होते.

IND vs PAK सामन्यात भारताचे ४ फलंदाज ६६ धावांवर तंबूत परतले होते आणि इशान-हार्दिकने १३८ धावांची विक्रमी भागीदारी करून संघाला २६६ धावांपर्यंत पोहोचवले होते. हार्दिकने ८७ धावांची खेळी केली होती. पावसामुळे भारतीय गोलंदाजांना गोलंदाजीची संधी मिळाली नाही आणि सामना रद्द झाला.

दुखापतीतून पुनरागमनानंतर हार्दिकच्या गोलंदाजीतही धार पाहायला मिळाली आहे आणि त्याने ट्वेंटी-२० पहिले षटकही फेकले आहे. पण, तो अद्यापही कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाच्या विचारात नाही. २०१८मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळले होता आणि आता त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

अष्टपैलू होण्याच्या तीव्र मेहनतीचे वर्णन करताना हार्दिक पांड्याने स्टार स्पोर्ट्सच्या फॉलो द ब्लूजवरील सत्रादरम्यान सांगितले की, “अष्टपैलू म्हणून माझ्यावर कामाचा भार इतरांपेक्षा दुप्पट किंवा तीनपट आहे. जेव्हा संघातील एक फलंदाज जाऊन फलंदाजी करतो आणि त्याची फलंदाजी संपवून घरी जात असतो, तेव्हाही मी गोलंदाजी करत असतो. म्हणून माझ्यासाठी सर्व व्यवस्थापन आणि सराव सत्रात प्रशिक्षण हे महत्त्वाचे आहे."

“जेव्हा सामना जवळ येतो, तेव्हा संघाला जे काही आवश्यक असते त्यापेक्षा मला अधिक द्यावे लागते आणि माझ्यासाठी किती षटके आवश्यक आहेत हे अधिक व्यावहारिक कॉल आहे. कारण जर १० षटकांची गरज नसेल, तर मी १० षटके टाकण्यात काही अर्थ नाही, परंतु जर १० षटकांची गरज असेल तर मी गोलंदाजी करेन. मी नेहमी स्वत:ला यशस्वी होण्याची संधी देतो," तो पुढे म्हणाला.