Join us  

WTC Final 2021 : कसा होता भारत-न्यूझीलंड यांचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास; जाणून घेऊया उत्तर

WTC Final 2021 : आयसीसी कसोटी विश्वविजेता अंतिम सामन्याची नांदी भाग ३ - कसोटी विश्वविजेतेपदाच्या अंतिम सामन्याच्या निमित्ताने आपण याआधीच्या लेखांत ह्या स्पर्धेचा साधारण ढाचा समजून घेतला. ह्या लेखात आपण जाणून घेऊया दोन्ही अंतिम संघांचा येथपर्यंत चा प्रवास. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:25 PM

Open in App

-सुबोध सुरेश वैद्य, बीसीसीआय अधिकृत गुणलेखक (स्कोअरर)

न्यूझीलंड संघाने भारत, पाकिस्तान, वेस्टइंडिज या देशांविरुद्ध मायदेशात २ कसोटी सामन्यांच्या मलिका खेळल्या. आणि या तिनही मालिकेत वर्चस्व गाजवत २-० अशी मात केली व स्वतःच्या गुणखात्यात घसघशीत कमाई केली. त्यांच्या परदेशातल्या मालिकेत ऑस्ट्रेलिया विरुध्द त्यांची डाळ शिजली नाही व ०-३ असा पराभव माथी आला. तर श्रीलंकेविरुध्दच्या मलिकेट १-१ अशी बरोबरी राखता आली. आणि बांगलादेश विरुध्दची मालिका रद्द करण्यात आली. तरीही संघनिहाय कामगिरी पाहता न्यूझीलंड चा संघ सातत्यपूर्णता राखत भारताला झुंजवू शकतो. आणि भारताविरूद्धच्या मालिकेतली त्यांची सरशी त्यांच्या साठी मनोबल उंचवायला पुरेशी आहे.  तसेच ह्या सामन्यापूर्वी त्यांना मिळालेला इंग्लड संघाबरोबर त्यांच्या प्रांगणातील दोन कसोटींची मालिका खेळण्याचा सराव फारच उपयुक्त ठरणार हे नक्की. सांगण्याचा मुद्दा असा कि, न्यूझीलंड-इंग्लंड मालिकेमुळे न्यूझीलंड ला वातावरणात खेळण्याचा व मिळवून घेण्याचा चांगलाच फायदा होणार आहे. कारण आधी ठरल्याप्रमाणे हा विश्वविजेतेपदाचा सामना लॉर्ड्स, म्हणजेच क्रिकेटच्या पंढरीत खेळवण्याचा कार्यक्रम होता, पण बायोबबल राखता येणे अवघड असल्याकारणाने व मैदान-निवासी उपलब्धता (मैदानालगत राहण्याची सोय) साऊथहॅम्पटन येथे होऊ शकत असल्यामुळे सामना स्थलांतरित करण्यात आला. 

WTC Final 2021: ...अन् भारतीय संघ ऐतिहासिक कसोटी वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडकला!

भारतीय संघाने आपल्या सहा मालिकेत पाच मालिका जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. मायदेशात खेळलेल्या तिन्ही मालिका (बांगलादेश २-०, इंग्लंड ३-१ व दक्षिण आफ्रिका ३-०) खिशात घातल्या. परदेशातील मालिकेत (ऑस्ट्रेलीया २-१, तर वेस्टइंडीज २-०) असे विजय मिळवले, न्यूझीलंड विरुध्दची मालिका ०-२ अशी हरले. त्यातही भारताने ५२० गुणांची तर न्यूझीलंड ने ४२० गुणांची मिळकत कमावली. उपलब्ध असलेल्या गुणांपैकी (म्हणजे ७२०) भारताने मिळवलेले ५२० गुण म्हणजे सरासरी ७२.२% होती. तर न्यूझीलंड संघाला उपलब्ध असलेल्या ६०० गुणांपैकी ४२० गुण मिळवत ७०% ची सरासरी राखली. त्याच बरोबर प्रत्येक गडी बाद होण्याच्या व करण्याच्या प्रमाणात, केलेल्या व दिलेल्या धावा यांचं गुणोत्तर प्रमाण भारतासाठी १.५७७ तर न्यूझीलंडचं हे प्रमाण १.२८१ इतके होतं. थोडंसं किचकट वाटेल, समजून घ्यायला पण वाटत तितकं गुंतागुंतीचं नाही. 

गुणतालिकेत स्थान निश्चिती करताना कमावलेले गुण समान असतील तर गुणांची टक्केवारी आणि तेही समान राहिलं धावा-गडी यांचे गुणोत्तर प्रमाण निर्णायक ठरविण्यास सहाय्यक ठरणार होते, नव्हे ठरले असतेच. तसं आयसीसी ने नियोजलं होत. पण तशी वेळ येऊ न देता दोन्ही संघानी सरधोपटपणे अंतिम सामन्यासाठी आपली जागा-निश्चिती केली. 

कसोटी विश्वविजेतेपदाच्या या स्पर्धेत (२०१९-२०२१) भारत व न्यूझीलंड या संघातील खेळाडूंनी केलेली ठळक कामगिरी अशी आहे. सर्वाधिक धावांच्या यादीत ऑस्ट्रेलिया चा लाबूशेन १६७५ धावा करून अव्वल स्थानावर आहे. तर भारताचा अजिंक्य रहाणे १०९५, रोहित शर्मा १०३० धाव करत अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर आहेत. विराट कोहली ८७७, मयांक अगरवाल ८५७ धावा करत अकरावं व बारावं स्थान पटकावून आहेत. तर चेतेश्वर पुजारा ८१८ धाव करून पंधराव्या स्थानी आहे. त्याच्या पाठोपाठ केन विल्यम्सन सोळाव्या स्थानी ८१७ धावा करून बसलाय. म्हणजेच पहिल्या पंधरात भारताचे पाच फलंदाज असल्यामुळे भारताची मदार असलेली फलंदाजी भक्कम आहे. वैयक्तिक कामगिरीचा मागोवा घेत असताना विराट कोहलीच्या २५४ धावांची दक्षिण आफ्रिकेविरुध्द ची पुण्यातली नाबाद खेळी निर्विवाद खणखणीत ठरली. मयांक अगरवाल च्या इंदोर येथे बांगलादेश विरुध्दच्या २४३ धावा (जोडीला दक्षिण आफ्रिके विरुध्द विशाखापट्टणम येथील २१५), रोहित शर्माच्या दक्षिण आफ्रिकेच्या विरुध्द रांची येथे २१२ धावा कमी नाहीत. विल्यम्सन ची दोन द्विशतके (वेस्टइंडीज २५१, पाकिस्तान २३८) न्यूझीलंडची जबाबदारी एकट्या विल्यम्सन वर असल्याची दर्शवतात

गोलंदाजांच्या यादीत ७० गडी बाद करीत कमिन्स अव्वल स्थानावर तर रविचंद्रन अश्विन ६७ गडी बाद करून तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड चा साऊदी ५१ गडी घेऊन पाचव्या स्थानी आहे. इशांत शर्मा (३६), मोहम्मद शामी (३६) तर बुमराह (३४) गडी खिशात घेऊन भारताची गोलंदाजी भरभक्कम असल्याची साक्ष देतात. न्यूझीलंड साठी जेमिसन, बोल्ट व वॅगनरही तोलामोलाची कामगिरी करून आहेत. वैयक्तिक कामगिरीत अश्विन ची १४५ धावात ७ बळी (दक्षिण आफ्रिका, विशाखापट्टणम) व तर ६१ धावात ६ बळी (इंग्लंड, चेन्नई), बुमराह २७ धावात ६ बळी (वेस्टइंडीज, किंग्जटन ) आणि अक्सर पटेल ३८ धावात ६ बळी (इंग्लंड, अहमदाबाद ) ह्यावर नजर टाकावीच लागेल. न्यूझीलंड चा जेमिसन ४८ धावात ६ बळी घेऊन (पाकिस्तान, ख्राइस्टचर्च) आपली छाप पडून आहे.

चला तर मग तय्यार आहात ना? आता, निवांतपणे सामना पाहायला व मौज घ्यायला?

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड