रोहित नाईक, उपमुख्य उपसंपादक
चखळगे आणि बरेच-चढ उतार असलेली डर्ट बाइक रेस (मातीच्या ट्रॅकवरील शर्यत) जिंकण्यासाठी चमचमणारी आणि सुसाट पळणारी स्पोर्ट्सबाइक घेऊन सहभाग घेतला आणि अखेर व्हायचा तो पराभव झालाच. सध्या काहीशी अशीच अवस्था भारतीय क्रिकेट संघाची झाली आहे. मानसिक आणि शारीरिक कस पाहणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने आयपीएल, टी-२० क्रिकेटमध्ये चमकलेल्या आणि सुसाट खेळलेल्या खेळाडूंची निवड केली आणि इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत पराभव स्वीकारला.
इंग्लंडविरूद्ध पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत मिळून पाच शतकांची नोंद झाल्यानंतरही भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, चार दिवस पकड मिळवल्यानंतरही भारतीयांचा पराभव झाला. कर्णधार नवा, खेळाडू नवे, अनुभवाची कमतरता या सर्व गोष्टी मान्य, पण हातातील सामना गमवावा इतकी अनुभवाची कमतरता या संघात नक्कीच नाही. भारतीय क्रिकेटचा नवा शुभारंभ म्हणत युवा शिलेदार दिमाखात इंग्लंडमध्ये दाखल झाले. पण, पहिल्याच सामन्यात त्यांना आरंभ ‘प्रचंड’ करता आला नाही.
सबकुछ आयपीएल
पूर्वी भारतीय संघातील खेळाडूंचा प्रवेश हा रणजी करंडक स्पर्धेतील कामगिरीवर अवलंबून असायचा. मात्र, आयपीएलने ही परंपरा मोडीत काढली. गौतम गंभीर यांनाही आयपीएलमधील यशानंतरच भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची संधी लाभली, मग तिथे खेळाडूंची होणारी निवड चालायचीच. रोहित शर्मा-विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर अनुभवी म्हणून चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यापैकी एकाची तरी संघात वर्णी लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, निवडकर्त्यांनी युवा खेळाडूंची सेना सज्ज करण्यावर भर दिला. यात चुकीचे काहीच नाही. युवांनी पहिल्याच सामन्यात विजयाची संधी निर्माणही केली, मात्र ही संधी साधण्यासाठी जो अनुभव पाहिजे, तोच नसल्याने हातातोंडाशी आलेला विजय हिरावला गेला.
याचा विचार करावाच लागणार
यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावलेल्या बी. साई सुदर्शन इंग्लंडच्या माऱ्यापुढे सपशेल अपयशी ठरला. त्याचवेळी, भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरूद्ध खेळताना ध्रुव जुरेलने चारपैकी तीन डावांत दमदार अर्धशतक झळकावले. मात्र, तरीही जुरेलऐवजी सुदर्शनला संधी मिळाल्याचे आश्चर्य वाटले. नक्कीच, सुदर्शनसारख्या गुणी खेळाडूला वेळ देणे गरजेचे आहे. मात्र, मालिकेत विजयी सुरूवात करण्यासाठी ४ कसोटींचा अनुभव असलेल्या जुरेलला प्राधान्य देणे गरजेचे होते. इंग्लंडमध्ये स्विंग माऱ्याला मिळणारी मदत पाहता अर्शदीप सिंगकडे झालेले दुर्लक्ष धक्कादायक होते. तो पहिल्या कसोटीत नक्कीच प्रभावी ठरला असता. शिवाय, त्याच्याकडे कौंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभवही आहे.
युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्धचा हातातोंडाशी आलेला विजय भारताने गमावला. हा पराभव विसरून वेळीच चुका सुधारून आगेकूच करण्याचे आव्हान टीम इंडियापुढे आहे. मालिका विजयाची संधी अद्यापही आहे. फक्त पराभवातून योग्य तो धडा घ्यावा लागेल.
अचूक रणनीती अन् योग्य संघनिवडच देईल यश
प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुभमन गिल हे दोघेही सध्या टीकाकारांच्या रडारवर आहेत. प्रत्येक पराभवानंतर 'जर-तर'च्या चर्चा रंगणार. टीका होणार. पण, याकडे कोणत्या दृष्टीने पाहून वाटचाल करणार, यावर दोघांचे यश अवलंबून आहे.
गिल शांत स्वभावाचा, पण गंभीर 'अरे ला कारे' म्हणण्यात तरबेज आहे. त्याचा हा स्वभाव सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेतही दिसून आला. त्यामुळे, दोघांनी या पराभवातून, होणाऱ्या टीकेतून शिकून वाटचाल करावी.
अचूक रणनीती आणि योग्य संघ निवड झाल्यास मालिका विजय शक्य आहे. कारण, अजूनही मालिका बरीच शिल्लक आहे.
आव्हान कठीण, पण अशक्य नाही...
इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत बुमराह खेळण्याची शक्यता कमी आहे. भारताचे युवा गोलंदाज गुणवान आहेत. त्यांच्याकडे सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमताही आहे. फक्त त्यांना संयम बाळगावा लागेल. अनेक गोलंदाज आयपीएलमधूनन पुढे आल्याने त्यांना झटपट नियंत्रण मिळवण्याची सवय आहे. कसोटी क्रिकेट पूर्णपणे वेगळे असल्याचे त्यांना समजून घ्यावे लागेल. यासाठी त्यांना रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांच्याकडून मार्गदर्शन मिळेल. बुमराहच्या अनुपस्थितीत खेळणे आव्हानात्मक आहे, पण अशक्य मात्र नाही.
Web Title: Will you correct your mistakes or continue to suffer?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.