Join us

विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?

IPL 2025: दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया पोस्ट टाकली होती. त्यात म्हटले होते, ‘आरसीबीला १८ वर्षे लागली, तुम्हीही वाट पाहू शकता !’ या नजरेतून कोहलीच्या प्रेरणादायी कहाणीकडे पाहिल्यास, धीर कसा धरावा, ध्येयाच्या दिशेने वाटचाल कशी करावी, याची प्रेरणा मिळते.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 12:35 IST

Open in App

-मतीन खान(स्पोर्ट्स हेड व सहायक उपाध्यक्ष, लोकमत समूह)दिल्ली पोलिसांनी सोशल मीडिया पोस्ट टाकली होती. त्यात म्हटले होते, ‘आरसीबीला १८ वर्षे लागली, तुम्हीही वाट पाहू शकता !’ या नजरेतून कोहलीच्या प्रेरणादायी कहाणीकडे पाहिल्यास, धीर कसा धरावा, ध्येयाच्या दिशेने वाटचाल कशी करावी, याची प्रेरणा मिळते.  आयपीएलचे ७४ दिवसांचे एंटरटेनमेंट संपले. पण आयपीएलमध्ये असे अनेक धडे होते, ज्यांनी आयुष्य अधिक चांगले कसे बनवायचे हे देखील शिकवले. रोज संध्याकाळी ७:३० ते मध्यरात्रीपर्यंत टीव्ही किंवा मोबाइलवर चिकटून राहणाऱ्या करोड़ों क्रिकेटप्रेमींना आयपीएलने काय शिकवले ते पाहू. १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, बंगळुरूने पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आणि जर कोणी या विजयासाठी पात्र असेल, तर तो विराट कोहली होता, ज्याच्याकडून शिकण्यासारख्या तीन गोष्टी आहेत, त्या म्हणजे आय.पी.एल. 

‘आय’ म्हणजे इन्स्पिरेशन (प्रेरणा) कोहलीची कहाणी जगभरातील तरुण क्रिकेटपटू, चाहत्यांसह अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्याच्या यशाने हे दाखवून दिले की, निष्ठा आणि कठोर परिश्रम असतील तर मोठे होता येते. इतकेच नाही तर, विराट हा संघाचा कर्णधार रजत पाटीदारसह प्रत्येक खेळाडूसाठी इन्स्पिरेशन होता. संघातला प्रत्येक खेळाडू आयपीएल कप विराटला समर्पित करू इच्छित होता.

‘पी’ म्हणजे पेशन्स (संयम)कोहलीची आयपीएल विजेतेपदासाठी १८ वर्षांची प्रतीक्षा दीर्घ होती, पण त्याने कधीही हार मानली नाही. तो म्हणाला की, त्याने या संघाला त्याचे तारुण्य, उत्कृष्ट वेळ आणि अनुभव सर्वकाही दिले. आरसीबीने जेतेपद पटकावले, तेव्हा त्याच्या संयमाला आणि चिकाटीला यश मिळाले. कठोर परिश्रम आणि दृढनिश्चय यश मिळवून देऊ शकतात, हे त्याने सिद्ध केले. सचिन तेंडुलकरलाही विश्वचषक जिंकण्यासाठी २२ वर्षे वाट पाहावी लागली. 

‘एल’ म्हणजे लाॅयल्टी (निष्ठा)संघाच्या चढ-उतारांना न जुमानता कोहली १८ वर्षे आरसीबीसोबत राहिला. संघाप्रती असलेली त्याची वचनबद्धता समर्पण आणि चिकाटीचे हे उत्तम उदाहरण आहे. जास्त किंमत मिळवण्याच्या मोहात त्याने  बंगळुरू संघ सोडला नाही. २०२१ मध्ये त्याने कर्णधारपद सोडले. या हंगामात तो एका अननुभवी आणि तरुण कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळला, परंतु त्याने दाखवूनदिले की, अनुभव आणि कौशल्य हे संघासाठी  महत्त्वपूर्ण ठरू शकतात. आयुष्यात यश मिळवायचे तर विराटचा हा आयपीएल फॉर्म्युला अवलंबून बघा.

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरइंडियन प्रिमियर लीग २०२५