लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : क्रिकेटमध्ये कधी कधी योगायोगही महत्त्वाचे ठरतात. यावर विश्वास ठेवला तर गुरुवारी भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत केल्यास भारत जेतेपदही जिंकेल. विश्वचषक स्पर्धेच्या (वनडे आणि टी-२०) इतिहासात दोनदा असे घडले आहे की, जेव्हा भारताने इंग्लंडला उपांत्य फेरीत हरवले व विजेतेपद पटकावले आहे.
१९८३ (वनडे विश्वचषक) : भारताने यजमान इंग्लंडला उपांत्य फेरीत ६ गड्यांनी हरवले. फायनलमध्ये वेस्ट इंडिजला पराभूत करून विजेतेपद मिळवले.
२०२४ (टी-२० विश्वचषक) : भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव केला. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून जेतेपद पटकावले.
भारताचा पराभव : १९८७ (वनडे विश्वचषक) आणि २०२२ (टी-२० विश्वचषक)च्या उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
जिंकण्यासाठी भारताला काय करावे लागेल?
१) अभिषेक शर्माला त्याच्या शैलीनुसार मोठी झंझावाती खेळी करावी लागेल.
२) अभिषेकने मोठी खेळी खेळल्यास संजू सॅमसनला दुसरी बाजू लावून धरावी लागेल.
३) सूर्यकुमार यादवला कर्णधाराला साजेशी खेळी करावी लागेल, तर इशान किशनला संयम दाखवावा लागेल.
४) वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध महागडा ठरल्यानंतर वरुण चक्रवर्तीला सातत्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल.
५) जसप्रीत बुमराह नेहमीप्रमाणेच शानदार फॉर्ममध्ये आहे; परंतु शेवटच्या पाच षटकांत इतर गोलंदाजांना अधिक चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
६) हार्दिक पांड्यावर नेहमीप्रमाणे दुहेरी जबाबदारी असेल. त्याला मध्यक्रमात वेगवान धावा करण्यासोबतच गोलंदाजीतही चमक दाखवावी लागेल.
७) भारताला क्षेत्ररक्षणात सुधारणा करावी लागेल.