२०२६ च्या टी-२० विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून सुपर ८ फेरीतील चुरस वाढली आहे. २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मात्र, भारताचा पुढचा प्रवास सोपा नसून वेस्ट इंडिजविरुद्धचा शेवटचा सामना टीम इंडियासाठी 'नॉक आउट' सामना ठरणार आहे.
भारत आपला सुपर ८ मधील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना १ मार्च रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीत प्रवेश करेल. त्यामुळे या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
पावसामुळे सामना रद्द झाला तर काय?
- भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांचे प्रत्येकी ३ गुण होतील.
- निकालासाठी 'नेट रन रेट'चा आधार घेतला जाईल.
- भारताचा रन रेट -०.१०० आहे, तर वेस्ट इंडिजचा रन रेट +१.७९१ इतका सरस आहे.
- म्हणजेच, चांगल्या रन रेटच्या जोरावर वेस्ट इंडिज उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
- सेमीफायनल गाठण्यासाठी भारताला विजय आवश्यक आहे.
टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी
या विश्वचषकात भारताने आतापर्यंत अत्यंत प्रभावी कामगिरी केली. ग्रुप स्टेजमधील सर्व चारही सामने जिंकून भारताने दिमाखात सुपर ८ मध्ये प्रवेश केला. परंतु, सुपर ८ च्या पहिल्या सामन्यात त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ७६ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात तरी झिम्बाब्वेला नमवून संघाने पुन्हा एकदा लय मिळवली आहे. संपूर्ण स्पर्धेत भारताने आतापर्यंत केवळ एकच सामना गमावला आहे. आता १ मार्चला होणाऱ्या महामुकाबल्यात सूर्या ब्रिगेड वेस्ट इंडिजचे आव्हान मोडीत काढून सेमीफायनलचे तिकीट मिळवते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.