२०२६ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीने केवळ भारतीय चाहतेच नव्हे, तर सरहद्दी पलीकडील पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटूही भारावून गेले आहेत. शाहिद आफ्रिदी आणि रशीद लतीफ यांसारख्या दिग्गजांनी भारतीय संघाच्या बेंच स्ट्रेंथ आणि सातत्याचे तोंडभरून कौतुक केले आहे. मात्र, यानंतर भारत आणि पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटल्याचे पाहायला मिळाले.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. आफ्रिदी म्हणाला की, "भारतीय संघाची बेंच स्ट्रेंथ इतकी मजबूत आहे की, मैदानावरील खेळाडूंप्रमाणेच बाहेर बसलेले खेळाडूही तितकेच सक्षम आहेत. यामुळेच भारत मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने यशस्वी होत आहे." आफ्रिदीने या विजयासाठी काही खेळाडूंचा विशेष उल्लेख केला. तो म्हणाला की, सॅमसनला मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले आणि संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. तसेच अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे फलंदाजी केली, ते पाहून भारतीय क्रिकेटचे भविष्य सुरक्षित असल्याचे आफ्रिदीने म्हटले. दरम्यान, शाहिद आफ्रिदीने भारतीय संघाचे कौतुक केल्याने पाकिस्तानी चाहत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
माजी यष्टीरक्षक रशीद लतीफ यांनी भारतीय संघ आणि पाकिस्तानी संघ यांच्यातील फरक सांगितले. लतीफ यांच्या मते, भारतीय संघात असलेली स्थिरता आणि खेळाडूंना मिळणारा विश्वास यामुळेच ते दबावाखाली उत्तम कामगिरी करू शकतात. पाकिस्तान संघात होणारे सततचे बदल आणि अस्थिरता यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला.
टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयासह भारताने सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला असून, संपूर्ण क्रिकेट जगतातून टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.