आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बाहेर झालेल्या वेस्ट इंडिजच्या संघावर मायदेशी परतण्यासाठी मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे. टीम इंडियाविरुद्ध कोलकाता येथे आपला शेवटचा सुपर ८ सामना खेळल्यानंतर, वेस्ट इंडिजचा संघ गेल्या पाच दिवसांपासून भारतातच अडकून पडला आहे. पश्चिम आशियातील वाढत्या लष्करी तणावामुळे आंतरराष्ट्रीय हवाई क्षेत्रावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे ही परिस्थिती ओढवली आहे.
संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी या अनिश्चिततेमुळे आपली नाराजी आणि हतबलता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर व्यक्त केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आम्हाला घरी जायचे आहे... कृपया आम्हाला काहीतरी अपडेट द्या...आज, उद्या की पुढच्या आठवड्यात? आम्ही मायदेशी कधी परतणार? गेल्या पाच दिवसांपासून आम्ही भारतात अडकून पडलो आहोत."
पश्चिम आशियात, विशेषतः इराणवरील लष्करी हल्ल्यांनंतर अनेक देशांनी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा वळवण्यात आली आहेत. वेस्ट इंडिजला जाणाऱ्या विमान मार्गावरही याचा परिणाम झाल्याने खेळाडू कोलकाता येथील एका हॉटेलमध्येच अडकून पडले.
पाच दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आता वेस्ट इंडिज संघासाठी दिलासादायक बातमी समोर आली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, संघाला मायदेशी पाठवण्यासाठी एका विशेष चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. डॅरेन सॅमी यांना प्रवासाबाबत अपडेट मिळाले असून त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड किंवा आयसीसीकडून अद्याप या प्रवासाच्या वेळापत्रकाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, चार्टर विमानामुळे खेळाडू लवकरच आपल्या कुटुंबाकडे पोहोचतील अशी शक्यता आहे.