- व्ही. व्ही. एस. लक्ष्मण लिहितात...
पंजाबविरुद्ध मोहालीत झालेला पराभव विसरण्यास सनरायझर्स हैदराबादसाठी पाच दिवस पुरेसे होते. मोसमात हा दुसरा पराभव होता. सामन्याआधी पाऊस पडल्याने मैदान ओले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजीचा निर्णय नुकसानदायी ठरला. वॉर्नरसारखा दिग्गज फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अखेरच्या दहा षटकात १०० धावा काढून आम्ही १५० ही आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकलो. तरीही आम्हाला २० धावा कमी पडल्या.
लोकेश राहुल आणि मयांक अगरवाल यांच्या चांगल्या सुरुवातीमुळे पंजाब सहज जिंकण्याच्या स्थितीत होता. तथापि आमच्या गोलंदाजांनी चांगला मारा करीत रंगत वाढविली.सामना रोमहर्षक स्थितीत पोहोचला होता, पण विजय पंजाबचाच झाला. निकाल महत्त्वपूर्ण नाही, आमच्या खेळाडूंचा अखेरपर्यंत चाललेला संघर्ष महत्त्वाचा ठरला. पाच दिवसाची विश्रांती लाभदायी ठरली. तीन दिवस क्रिकेटपासून अलिप्त राहून संघातील एकजुटतेवर भर दिला. अखेरचे दोन दिवस कसून सरावात घालवले. त्यामुळे संघात नवा उत्साह संचारला आहे. ब्रेकमुळे खेळाडूंना आत्मपरीक्षणाची संधी मिळाली. शिवाय दुखापतग्रस्त खेळाडूंना सावरण्यास वेळ मिळाला. ते आता निवडीसाठी तयार आहेत. स्पर्धेच्या मधल्या टप्प्यात प्रवेश करीत असताना खेळाडूंचे फिटनेस महत्त्वाचे आहे.
आगामी आठवडा आमच्यासाठी मोलाचा ठरणार आहे. तीन सामने घरच्या मैदानावर खेळायचे असून त्यात विजयी झाल्यास जर- तर ची स्थिती राहणार नाही. शिवाय वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळताना प्रतिस्पर्धी संघाची ताकद ओळखण्याची संधी असेल. ही बाब सर्वच फ्रेंचाइजीसाठी लागू असेल. पुढील तीन सामने उप्पल स्टेडियमवर खेळणार असल्याने हैदराबाद संघाचा आत्मविश्वास आणखी उंचावेल, यात शंका नाही.